दरवर्षीपेक्षा यंदाचा दसरा खूप वेगळा असणार आहे. हा सण तुम्ही कसा साजरा करणार आहात? सीमोल्लंघनाची प्रथा जपताना तुम्ही नेमकं काय करणार आहात? असा प्रश्न 'मुंटा'नं काही मराठी कलाकारांना विचारला. नेमकं काय करणार आहेत ते? जपू मानसिक आरोग्य सध्या सगळ्यांचंच कामाचं वेळापत्रक खूप विस्कळीत झालं आहे. आर्थिक गणितं सोडवता-सोडवता ताण वाढतोय. अस्वस्थता, नैराश्य या मानसिक समस्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे. आपण नेहमी शांतपणे स्वत:चं आणि समोरच्याचं म्हणणं ऐकून घेणं खूप महत्त्वाचं असतं. दसऱ्याच्या निमित्तानं मी वाचकांना आवाहन करू इच्छिते, की स्वत:च्या रागाची, चिंतेची, दु:खाची मुळं आपणच शोधू या. भावनांचा उद्रेक टाळून, सापेक्ष नजरेतून सभोवताली पाहू या. तुमच्या आजुबाजूच्या लोकांना धीर द्या, दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घ्या. समस्या गंभीर वाटत असेल, तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. स्वतःचं मानसिक आरोग्यही निगुतीनं जपा. - सकारात्मक विचारकरोनावर लस येईपर्यंत मास्क हेच आपलं शस्त्र आणि अस्त्र आहे. आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच या परिस्थितीत विचार सकारात्मक ठेवणं खूप आवश्यक आहे. विविध प्रकारच्या अडचणींचा सामना आपण करतो आहोत. या परिस्थितीत तग धरून राहणं खूप महत्त्वाचं आहे. हा कठीण काळ आपल्याला खूप काही शिकवणारा आहे. दसऱ्याच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा नव्यानं स्वतःला समजावून सांगणार आहे, की सगळं व्यवस्थित होणार ही आशा कायम ठेवायची. आयुष्यातील बदल स्वीकारायचे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करायची. -सई ताम्हणकर काम-आरामाचा समतोल लॉकडाउन हा एक अनपेक्षित असा धक्का होता. पण, या काळात भरपूर मोकळा वेळ मिळाला. स्वतःकडे लक्ष देण्यासाठी सहसा वेळ काढला जात नाही. लॉकडाउननं तो वेळ मिळवून दिला. आता पुन्हा एकदा कामाचं व्यग्र असं वेळापत्रक सुरू झालं आहे. तरीही स्वतःसाठी आवर्जून वेळ काढायचा, असं मी ठरवलं आहे. शारीरिक आरोग्यासाठी नियमितपणे व्यायाम करायचा. खाण्या-पिण्याच्या वेळा सांभाळत संतुलित आहार घ्यायचा. काम आणि आराम यांचा समतोल सांभाळायचा. तब्येतीची नीट काळजी घेतली, तरच दररोजचा दिवस नव्या उमेदीनं जगता येईल. -वैदेही परशुरामी निर्मिती क्षेत्रात पदार्पण दसऱ्याच्या निमित्तानं मी एका वेगळ्या भूमिकेत प्रवेश करणार आहे. प्रथमच मी एका चित्रपटाची निर्मिती करणार आहे. माझा मित्र निखिल महाजन याच्यासह 'गोदावरी' या चित्रपटाची निर्मिती मी करतो आहे. सध्याची एकूण परिस्थिती पाहता चित्रपट कधी प्रदर्शित होईल याचा काहीच अंदाज येत नाहीय. तरीही धाडस करून चित्रपटाची निर्मिती करण्याचं पाऊल मी उचललं आहे. मुळात चित्रपटात काम करणं, चित्रपट घडताना पाहणं हा माझा आनंद आहे. हाच आनंद प्रेक्षकांनाही लवकरात लवकर वाटता यावा अशी इच्छा आहे. -जितेंद्र जोशी स्वतःशी नातं घट्टकुठलाही सण म्हटला की दरवर्षी कुटुंबीय, मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या भेटीगाठी होतात. पण, यंदा सण साजरा करण्याचं स्वरूपच पूर्णतः बदलून गेलं आहे. या दसऱ्याला मला चिंचवडला माझ्या घरी जाता येणार नाहीय. सतत काम सुरू आहे. त्यामुळे प्रवासाची दगदग मी टाळतो आहे. आई-बाबांशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्कात असलो, तरीही दसऱ्याच्या दिवशी मुंबईतल्या घरी मी एकटाच असणार आहे. दाराला तोरण वगैरे लावून, घर सजवून, गोड पदार्थ करून मी सण साजरा करणार आहे. या परिस्थितीनं आपल्याला स्वतःबरोबर राहायला, स्वतःसोबतही छान वेळ घालवायला शिकवलंय, असं मला वाटतं. या निमित्तानं स्वतःचं स्वतःशी असलेलं नातं घट्ट होणार आहे. -भूषण प्रधान शब्दांकन - गौरी आंबेडकर, रुईया कॉलेज


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34wn5TH