आपल्याकडच्या तथाकथित ‘सस्पेन्स थ्रिलर’चा एक साचा ठरलेला आहे. जुन्या हवेलीतील गत जन्माचे किंवा मग काही दशकांपूर्वीचे संदर्भ आणि मग सध्याच्या काळात त्याला ‘कनेक्ट’ होणारी एक गोष्ट. मुख्य व्यक्तिरेखेच्या वर्तनामध्ये अचानक बदल आणि मग भूतकाळाचा ‘बदला’ वैगरे वैगरे असा हा मामला एकदम ठरलेला. भूमी पेडणेकरची मुख्य भूमिका असलेला आणि तेलगू दिग्दर्शक जी. अशोक दिग्दर्शित ‘दुर्गामती’ ही अशीच एक गोष्ट मांडतो. अशोक यांच्याच २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलगू ‘भागामती’चा हा रीमेक आहे. गूढ कथानकाच्या जोडीला सत्तेचा गैरव्यापर, त्याच्या अनुषंगून होणारा भ्रष्टाचार असे ‘तडके’ मारून ही कथा सजवण्यात आली आहे. मात्र, ‘सस्पेन्स थ्रिलर’चा हा खेळ म्हणावासा रंगत नाही. एका विशिष्ट टप्प्यामध्ये त्यातील रहस्य संपून जातं. शेवटी काही ‘ट्विस्ट’ येतातही. पण, असे मालमसाला ठासून भरलेले साउथचे सिनेमे नेहमी पाहणाऱ्यांना हे ‘ट्विस्ट’ सहज लक्षात येतात. त्यामुळे त्यातील मजाच निघून जाते. ईश्वर प्रसाद () हा एक स्वच्छ चारित्र्याचा मंत्री आहे. अचानक त्याच्या मतदारसंघातील मंदिरांमधील मूर्तींची चोरी होण्यास सुरुवात होते आणि वातावरण तापू लागतं. काही जण ईश्वर प्रसाद यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. ईश्वर प्रसाद आपला राजकीय वारसदार जाहीर करतात. त्यांचं राजकीय वर्चस्व रोखण्यासाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू होतात. त्यांच्यावर भ्रष्टाचारी असा शिक्का बसवण्यासाठी सीबीआय चौकशीचा खेळ खेळला जातो. शताक्षी गांगुली () या चौकशीचं नेतृत्व करते. ईश्वर प्रसादची ‘कुंडली’ काढण्यासाठी एका गुन्ह्यामध्ये तुरुंगात असलेल्या आणि काही वर्षांपूर्वी ईश्वर प्रसादची सचिव असलेल्या आयएएस अधिकारी चंचल चौहानची () चौकशी करण्याचं ठरतं. त्या भागातील ऐतिहासिक राणी दुर्गामतीच्या एका सुनसान आणि पुरातन राजवाड्यात ही चौकशी सुरू होते आणि त्यानंतर सुरू होतो एक थरारक खेळ. ही चौकशी पूर्ण होते का? दुर्गामतीचा इतिहास आणि चंचल यांचा काय संबंध आहे? गायब झालेल्या मूर्तींचं प्रकरण काय आहे? चंचल आणि ईश्वर प्रसाद या दोन व्यक्तिरेखांचा एकमेकांशी संबंध काय यासारख्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी ‘दुर्गामती’ पाहायला हवा. वरकरणी पाहता सिनेमाची कथा रहस्यमय वाटते. पण, त्याची मांडणी करताना अनेक अपेक्षित वळणं येत राहतात आणि त्यातील गंमत निघून जाते. भूमी पेडणेकर आपल्या व्यक्तिरेखेत जीव ओतून हा थरारक खेळ पूर्ण ताकदीने रंगवते. पण, एकूण प्रभावामध्ये सिनेमा कमी पडतो. दिग्दर्शक अशोक यांचा सिनेमावरील ‘होल्ड’ मध्येच जातो. तो पुन्हा काही काळ येतो. पण, नंतर पुन्हा गडबड होते. ईश्वर प्रसादची व्यक्तिरेखा लिहितानाही अनेक परस्परविरोधी गोष्टी दिसतात. सरकारी यंत्रणांमधील गैरमार्ग, सत्ता व पैशांसाठी नागरिकांना लुबाडण्याचे प्रकार आणि त्याच वेळी काही गूढ, अद्भुत गोष्टी अशा दोन टोकांच्या गोष्टी ओढूनताणून एकत्र आणल्यासारख्या वाटतात. पुरातन हवेलीतील तथाकथित ‘भयावह’ दृश्ये आपण अनेक सिनेमांत पाहिली आहेत. अंगात ‘भूत’ संचारल्यानंतर होणारी आदळआपटही आपल्याला नवीन नाही. सिनेमाचा मूळ ढाचा दक्षिणेकडील चित्रपटाचा असल्यामुळे त्यामध्ये असलेला बटबटीतपणा येथेही जाणवतो. किंबहुना अशा बटबटीतपणासाठी काही अतार्किक गोष्टींची जोड दिल्याचं जाणवत राहतं. अर्शद वारसी, , माही गिल यांसारखे कलाकार आपापल्या भूमिकांना न्याय देतात. चित्रपटात गाणी नाहीत. पार्श्वसंगीतही हॉररपटांप्रमाणे उगाचच दचकवण्याचं काम करणारं. थोडक्यात काय तर ‘दुर्गामती’ हा एक बऱ्या कॅटेगिरीमध्ये असलेला सिनेमा आहे. तो फार काही वेगळं दाखवत नाही. चार घटका टाइमपास करण्याचं काम करतो. ‘ओटीटी’वर तो आवर्जून पाहायचा का याचा निर्णय ज्याचा त्यानं घ्यायचा आहे. निर्माता: विक्रम मल्होत्रा, भूषण कुमार, अक्षय कुमार पटकथा: श्वेता मोर दिग्दर्शन: जी. अशोक संगीत: जॅक्स बेजॉय कलाकार: भूमी पेडणेकर, अर्शद वारसी, माही गिल, जिशू सेनगुप्ता ओटीटी: अॅमेझॉन प्राइम दर्जा: अडीच स्टार पाहा ट्रेलर:
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/385clvO
