Full Width(True/False)

...तोपर्यंत राज्यात नाट्यप्रयोग होणार नाहीत; रंगमंच कामगारांचा मोठा निर्णय

मुंबई: 'गेल्या वर्षीच्या लॉकडाउनच्या जखमेतून आम्ही अजून सावरलेलो नाहीत. कसेबसे दिवस ढकलत आहोत. आम्हाला चमचमीत जेवणाची आशा नाही. पण, दोन वेळ डाळ-भात पोटात जावा; हीच अपेक्षा आहे. वर्षाच्या सुरुवातीला तीन-चार महिने नाटकांचे प्रयोग लागले त्यातून दिवसाला मिळणाऱ्या मानधनातून घर चालत होतं. पण, करोनाच्या दुसऱ्या लाटेने तेदेखील हिरावून घेतलं. पुन्हा नाट्यगृह बंद केल्यानं मिळकत थांबली. आमच्या काही रंगमंच कामगारांच्या डोक्यावर कर्ज आहे, भाड्याचे घर, घरात लहान मुले आहेत. आम्ही जगायचं कसं? आम्हाला काम करुन पैसे कमावून; जगण्याचा हक्क नाही का?' ही व्यथा आहे मराठी रंगभूमीवर कार्यरत असलेल्या रंगमंच कामगारांची. परिणामी गेल्या दोन महिन्यापासून मदतीसाठी आर्त हाक राज्य सरकारला देत आहेत. पण, राज्याच्या सांस्कृतिक खात्याला आणि राज्य सरकारला अद्याप ही हाक ऐकू आलेली नाही. त्यामुळे आता मुंबईतील रंगमंच कामगारांनी नाईलाजाने 'नाट्यप्रयोग न करण्याचा' पवित्रा घेतला आहे. बुधवारी पार पडलेल्या रंगमंच कामगार संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एक मतानं महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला आहे. करोनाकाळात गेले पंधरा महिने महाराष्ट्रातील व्यावसायिक नाटकाचे नाट्यप्रयोग लॉकडाउनमुळे बंद आहेत. 'आजपर्यंत महाराष्ट्र सरकारबरोबर पत्रव्यवहार केला आहे, परंतु आजपर्यंत सरकारने रंगमंच कामगारांना काहीही मदत केलेली नाही', असं स्पष्ट वक्तव्य संघटनेनं पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. तसंच रंगमंच कामगारांच्या संघटनेनं दोन महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केले आहे. ते असे की, महाराष्ट्र सरकारने ७५० मराठी नाट्य व्यावसायिक रंगमंच कामगारांना दरमाही प्रत्येकी ५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी. तसंच राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृह एकाच वेळी सुरू करावीत. जेणेकरून सुसूत्रता राहील. या दोन्ही मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात कोणताही नाट्यप्रयोग, रंगमंच कामगार करणार नसल्याचे संघटनेचे प्रवक्त रत्नकांत जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gP7lQf