Full Width(True/False)

...म्हणून संजय नार्वेकर अचानक हिंदी मालिकांमध्ये झाला सक्रिय

संपदा जोशी ० अचानक हिंदी मालिकांमध्ये सक्रिय होण्याचं कारण काय?- विशेष कारण नाही. मी याआधी मालिका केल्या नव्हत्या. मालिका करायची इच्छा होती पण नाटक आणि सिनेमांमध्ये व्यग्र असल्यामुळे कधी वेळ मिळाला नाही. करोनामुळे वेळच वेळ मिळाला. तेव्हाच दोन हिंदी मालिकांसाठी विचारणा झाली. दोन्ही भूमिका आवडल्या. टीव्ही हे माध्यम जवळून बघता यावं आणि नवीन गोष्टी शिकता याव्यात म्हणून मी मालिकेत काम करायचं ठरवलं. आता 'गुम है किसी के प्यार में'मधील माझं काम संपलंय. पण त्या भूमिकेनं बरंच काही शिकवलं. ० 'गुम है किसी के प्यार में'मध्ये पोलीस आणि ''मध्ये साईभक्त या दोन्ही भूमिका भिन्न आहेत. हा अनुभव कसा होता ?- कलाकाराला आव्हानं स्वीकारायला आवडतात. त्याच त्या भूमिका करून तो स्वतःला बांधून ठेवू शकत नाही. पोलीस साकारताना ती स्टाइल, रूबाब आणि समाजसेवक, साईभक्त साकारताना व्यक्तिमत्वातला साधेपणा शिकलो. दोन्ही भूमिका वेगळ्या असल्यानं त्या साकारताना खूप समाधान मिळालं. ० वेबविश्वात कधी दिसणार ?- मी 'सिरियस मॅन' या वेब सीरिजमध्ये काम केलं. त्यातल्या भूमिकेसाठी माझं कौतुकही झालं. 'एस्केप लाइव्ह' या वेब सीरिजचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. लवकरच ती सीरिज प्रेक्षकांना बघायला मिळेल. ० पुन्हा नाटकं कधी ?- नाटक ही माझी आवड आहे. नाटकातून मला खूप काही शिकायला मिळतं. त्यामुळे नाटकात काम करतच राहणार. कदाचित माझी आधीची काही जुनी नाटकं पुन्हा सुरू होतील. ० सिनेसृष्टीतील इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर दिग्दर्शन करावसं वाटत नाही का?- दिग्दर्शन करावं असं प्रत्येकाला वाटतं. मलाही दिग्दर्शन करायचं आहेच. पण त्यासाठी उत्तम संहिता हवी. नवीन दिग्दर्शकांकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. चित्रपट मांडण्याची भाषा आता बदलत चालली आहे. मी सर्वात आधी या नवीन गोष्टी शिकेन. त्यानंतर मला आता यातलं कळतंय असं वाटलं आणि एखादी चांगली संहिता मिळाली तर मी नक्की दिग्दर्शनाचा प्रयत्न करेन. ० सोशल मीडियावर फार दिसत नाहीस. असं का?- मी फक्त व्हॉट्सअॅपचा वापर करतो. बाकी कशावरच मी नाही. माझ्यासाठी तेवढं पुरेसं आहे. सतत लोकांसमोर राहणं हा अट्टहास टाळायला हवा. माझं खासगी आयुष्य माझंच रहावं. मला माझ्या कुटुंबाला वेळ देता यावा, असं मला वाटतं. सोशल मीडिया हे उत्तम माध्यम आहे. पण मला त्यापासून थोडंसं अलिप्त राहायला आवडतं. ० चाहत्यांशी संवाद कसा साधतोस?- नाटकातून. नाटकामुळे त्यांच्याशी समोरासमोर बोलता येतं. नाटक संवाद साधण्यासाठी उत्तम माध्यम आहे. तसंच वृत्तपत्रांशी संवाद होतो तेव्हा त्यांच्यामार्फतही प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोच.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3q711qE