संदर्भांचे बिंदू जोडून भूतकाळ-वर्तमानाचे चक्र रंगविणारे, काळाशी खेळत असतानाच मानवातील गुण-दोषांवर प्रकाश टाकणारे सुजय घोषचे सिनेमे दर वेळी एक वेगळा अनुभव देऊन जातात. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुजयच्याच ‘कहानी’मध्ये मृत दाखविलेल्या एका व्यक्तिमत्त्वाचा नवा प्रवास ‘’मध्ये मांडला जातो. ‘कहानी’इतकी त्याची मांडणी वेधक नसली तरीही दिया घोष दिग्दर्शित ‘बॉब बिस्वास’ लक्षवेधी ठरतो. सुजय घोषच्या चित्रपटात कोलकाता एक महत्त्वाची व्यक्तिरेखा असते. इथेही ती आहेच. बॉब बिस्वास () कोलकाता येथेच राहत असून, एका जीवघेण्या अपघातानंतर आठ वर्षांनी तो कोमातून बाहेर आला आहे. त्याला हॉस्पिटलधून डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र, बॉब आपल्या भूतकाळाबद्दल अनभिज्ञ आहे. आपण नक्की काय करीत होतो? आपल्या आयुष्यात कोण कोण होते, याबाबत त्याला काहीही आठवत नाही. पत्नी मेरी (), बेनी (रोनित अरोरा), मिनी (समरा तिजोरी) अशा कुटुंबासह राहणाऱ्या बॉबच्या आयुष्यात काही जणांचा प्रवेश होतो. त्याच्या संपर्कात आलेले लोक बॉबकडून काही जणांचे खून करून घेण्यास सुरुवात करतात. कोमातून बाहेर आल्यावर भूतकाळाप्रमाणेच एक विमा एजंट म्हणून काम करणाऱ्या बॉबच्या आयुष्यात नक्की काय झालंय? त्याचा भूतकाळ नक्की कोणत्या घटनांनी भरला आहे? शहरात सुरू असलेल्या ड्रग्जच्या रॅकेटशी तो कोणत्या कारणांनी जोडला गेला आहे? अतिशय थंड डोक्यानं एकापाठोपाठ एक हत्या करणाऱ्या बॉबला याबाबत काय वाटतंय? आपण करतोय ते चूक की बरोबर हे त्याला समजत आहे का? काळानं त्याच्यावर उगवलेल्या सुडाला तो कोणत्या पद्धतीनं सामोरा जातोय...यासारख्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ‘बॉब बिस्वास’ पाहायला हवा. वर म्हटल्याप्रमाणे विद्या बालन-सुजय घोषच्या ‘कहानी’तील एका व्यक्तिरेखेचा संदर्भ इथे येतो. मात्र, सिनेमा पूर्णपणे एक वेगळीच गोष्ट सांगतो. सुरुवातीला सिनेमा खिळवून ठेवतो. मध्यावर मात्र काहीसा ‘प्रेडिक्टेबल’ वाटतो आणि शेवटाकडे जाताना काहीसा लवकर गुंडाळला जातो. काही प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांवरच सोडून दिली जातात, काही प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं जातं. ‘थ्रिलर’च्या नादात कथेतील काही धागे सुटतात आणि ‘लॉजिक’ही बासनात गुंडाळलं जातं. तर्कशुद्ध सिनेमाची अपेक्षा आपण बाळगतो. मात्र, ती पूर्ण होत नाही. अर्थात तरीही एक सिनेमा म्हणून तो नक्की पाहायला हवा. त्या कथेत असलेलं नाट्य तुम्हाला खिळवून ठेवतं. ‘कहानी’त ही छोटीशी भूमिका शाश्वत चॅटर्जी या अभिनेत्यानं केली होती. मात्र, आजही ‘कहानी’ पाहिलेल्यांना ती लक्षात आहे. इथे अभिषेकनं साकारलेला बॉबही खूपच भन्नाट झाला आहे. काहीसं गूढ व्यक्तिमत्त्व, त्यासाठी आवश्यक असलेला तसाच गेट-अप असं सारं काही इथं जमून आलं आहे. तो बॉबचं व्यक्तिमत्त्व शंभर टक्के पडद्यावर साकारण्यात यशस्वी होतो. चित्रांगदा नेहमीप्रमाणे दिसते छान आणि आपली व्यक्तिरेखाही ताकदीने साकारते. यांचा कालीदा टिपिकल बंगाली बाबू असून, तोही लक्षात राहणारा. तीच गोष्ट बुभाई साकारणाऱ्या पुरब कोहलीची. व्यक्तिरेखांचं परफेक्ट आणि बंगाली वळणांचं कास्टिंग चित्रपटाची जमेची बाजू आहे. बॉबचं गूढ आयुष्य, त्याच्या स्वत:चा शोधाचा प्रवास, त्या प्रवासातील चांगल्या-वाईट गोष्टींशी आपण जोडले जातो. संवेदनशीलता आणि अपप्रवृत्ती या दोन्हींच दर्शन लेखक-दिग्दर्शक आपल्याला घडवतो. केवळ ‘थ्रिलर’मागे न लागता हा ‘ह्युमन टच’ सिनेमाला प्रेक्षणीय बनवतो. अर्थात असं बॉबचं आयुष्य किती लोक जगत असतील, ते असंच जगत असतील का? हे प्रश्न इथं फिजुल ठरतात. मेलोड्रामा रंगविण्यासाठी ते आवश्यक असतात. क्लिंटन सेरेजोचं पार्श्वसंगीतही आशय टिपणारं. अनेक प्रसंगात फक्त श्वासोच्छ्वासाचा वापरलेला ‘साउंड’ प्रभावी आहे. गैरिक सरकार यांची सिनेमॅटोग्राफी आणि यश रामचंदानी यांचं संकलनही नेमकं. थोडक्यात काय तर बॉब बिस्वास खूप ग्रेट नसला तरीही एकदा पाहण्यासारखा निश्चित आहे. निर्माते : गौरी खान, सुजय घोष, गौरव वर्मा दिग्दर्शक : दिया अन्नपूर्णा घोष कथा-पटकथा : सुजय घोष, राज वसंत कलाकार : अभिषेक बच्चन, चित्रांगदा सिंह, , परन बंदोपाध्याय संगीत : विशाल-शेखर, क्लिंटन सेरेजो संकलक : यश रामचंदानी ओटीटी : झी फाइव्ह दर्जा : साडेतीन स्टार


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3DvQoE1