Full Width(True/False)

अश्विनी यार्दी ...हिंदी टीव्ही मालिका विश्वातील मराठमोळी लेडी बॉस

यांनी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत २९ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात टीव्ही मालिकांचे भावविश्व जवळून अनुभले आणि घडवले आहे. टीव्ही वाहिनीतील वलयांकित करिअर आणि त्यानंतर मराठी, हिंदी, पंजाबी अशा भाषांमध्ये सिनेनिर्मिती क्षेत्रात 'ग्रेझिंग गोट्स पिक्चर्स' या कंपनीच्या माध्यमातून केलेले काम असा त्यांचा मनोरंजन क्षेत्रातला दीर्घ आणि यशस्वी प्रवास आहे. अभिनेता अक्षयकुमार सोबत यार्दी यांनी संस्थापिका म्हणून 'ग्रेझिंग गोट्स पिक्चर्स'ची सुरुवात केली. तत्पूर्वी सुरुवातीला ‘झी’मध्ये आणि नंतर 'कलर्स' वाहिनीसाठी त्यांनी उल्लेखनीय काम केले. 'कलर्स' वाहिनी अस्तित्वात आली, तेव्हा या वाहिनीला चेहरामोहरा मिळवून द्यायची मोठी जबाबदारी अश्विनी यांच्यावर होती आणि ती त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. कलर्सवरच्या ‘उतरन’, ‘बालिका वधू’सारख्या वेगळ्या धाटणीच्या मालिका त्यांनी प्रेक्षकांना दिल्या. तसंच ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’ सारखे रिअ‍ॅलिटी शोज यशस्वी करून दाखवले. खरे तर वाहिनीला ‘कलर्स’ हे नावसुद्धा त्यांनीच दिले. स्त्रीकेंद्री प्रबोधनात्मक विषय त्यांनी ताकदीने छोट्या पडद्यावर मांडले. 'कलर्स' या वाहिनीच्या क्रिएटिव्ह हेड म्हणून काम करताना त्यांनी ही वाहिनी प्रस्थापित करण्यात मोठा वाटा उचलला. यशाच्या शिखरावर असतानाही नवी आव्हाने अनुभवण्यासाठी नोकरी सोडून स्वतंत्र निर्माती होण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला आणि तेथेही पदार्पणातच वेगळेपण दाखवून दिले. ‘७२ मैल’ सारखा चाकोरीबाहेरचा मराठी चित्रपट निर्माण करायची धडाडी त्यांनी दाखवली. ‘ओह माय गॉड’सारखा प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली. मनोरंजनाच्या क्षेत्रात लीडर म्हणून काम करणाऱ्या महिला' तसे पाहिले तर हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या, अश्विनी यांचे नाव त्यांच्यामध्ये अग्रक्रमानेच घ्यायला हवे. हात लावेन त्याचे सोने करेन असा परीसस्पर्श लाभलेल्या अश्विनी यांनी आताही 'विनी यार्द फिल्म्स'ची स्थापन करून मालिकानिर्मिती क्षेत्रात नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. 'स्पाय बहू'सारखा अनोखा स्त्रीकेंद्री विषय त्या यावेळी मांडत आहेत. 'येणारा काळ नक्कीच अवघड असणार आहे. स्पर्धा वाढली आहे. ओटीटी माध्यम झपाट्याने विस्तारते आहे. परिणामी टीव्ही मालिकांनादेखील प्रयोगशील विचार करून अनोखे विषय मांडायला हवे. टीव्ही माध्यम हे नक्कीच स्त्रीकेंद्री आहे. परंतु गेल्या काही वर्षात टीव्ही मालिकांना मोठ्या संख्येने पुरुष प्रेक्षकवर्गदेखील लाभला आहे. सोबतच आता तरुण प्रेक्षकवर्ग तयार करण्याकडे आपण अधिक भर द्यायला हवा.' असे अश्विनी सांगतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/NEqeczZ