Full Width(True/False)

अतुल कलकर्णी म्हणतायत शूटिंग, शहर यातलं काहीही मी मिस करत नाहीय!

हिंदी-मराठी चित्रपटांतून विविध लक्षवेधी भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते आगामी '' या वेब सीरिजमध्ये चमकणार आहेत. या निमित्तानं 'मुंटा'शी गप्पा मारताना, 'सिनेमा ही एक अत्यंत महागडी कला आहे. सिनेमांवर आपण काही गोष्टी लादतो तेव्हा ही महत्त्वाची गोष्ट विसरली जाते' असं त्यांनी सांगितलं. ० वेब सीरिज हे माध्यम कसं वाटतंय? वेब एक अप्रतिम माध्यम आहेत. चित्रपटात जर एखादी गोष्ट १२० ते १४० मिनिटांत सांगावी लागत असेल, तर वेब सीरिजमध्ये तुम्हाला चारशे-साडेचारशे मिनिटं मिळू शकतात. त्यामुळे लेखकाला प्रत्येक पात्र लिहायला पूर्ण वाव मिळतो. त्याचे कंगोरे दाखवता येतात. अर्थातच, नटाला त्या पात्रावर पुरेसं काम करता येतं. सीरिजचा दुसरा, तिसरा, चौथा सीझन आला, की तेच पात्र तुम्ही आणखी पुढे घेऊन जाऊ शकता. दरम्यानच्या काळात अभिनेता म्हणून, माणूस म्हणून तुम्ही आणखी शिकलेले असता. ० वेब सीरिजमध्ये बोल्ड दृश्यं असलीच पाहिजेत असं जणू एक समीकरण झालंय... मानवी आयुष्यात जे जे काही घडतं त्या सगळ्यासाठी कोणत्याही कलाकृतीमध्ये स्कोप असलाच पाहिजे. तो नसेल तरच प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. ते आवडतंय की नाही, बघायचं की नाही ते प्रेक्षक ठरवतील. कुठलाही चित्रपट, सीरिज बोल्ड आहे म्हणून चालतो असा काही नियम नाही. ज्या-ज्या म्हणून मानवी भावना आहेत त्या कलाकृतीमध्ये दाखवल्या गेल्या पाहिजेत. ० आगामी 'बंदिश बँडिट्स' या वेब सीरिजमध्ये तुम्ही एका गायकाची भूमिका साकारताना दिसताय. नेमकी कशा प्रकारे तयारी केली यासाठी? खूप अवघड आहे. खास करून शंकर महादेवन यांच्यासारखा ज्येष्ठ गायक जेव्हा तुमच्यासाठी गात असतो, तेव्हा पडद्यावर त्यानुसार अभिनय करताना तुमची कसोटी लागते. एक वेळ शब्द सिंक करणं सोपं आहे. पण जेव्हा एखादी सरगम असते, तेव्हा ती सिंक करणं अवघड होतं. सीरिजमध्ये मी साकारलेला दिग्विजय राठोड हा पट्टीचा शास्त्रीय गायक आहे. या भूमिकेसाठी गाण्याच्या अभिनयाचा खूप सराव करावा लागला. लहानपणापासून मैफिलींमध्ये गाताना पाहिलेले गायक, गायकांच्या व्हिडीओ क्लिप्स यांचा सराव करताना फायदा झाला. अंकीत नावाचे एक जण शूटिंगच्या वेळी यायचे. घरीदेखील येऊन ते रिहर्सल करून घ्यायचे. * लेखक अतुल कुलकर्णी यांनी लॉकडाउनच्या दिवसांत काय केलं? काही नवं लिखाण झालं का? मी अजिबातच स्वत:ला लेखक म्हणवून घेत नाही. एक स्क्रीप्ट लिहिलंय, त्याचं सध्या शूटिंग होतंय. पण, म्हणून मी स्वत:ला लेखक म्हणवून घेणार नाही. लॉकडाउनच्या काळात मी माझ्या शेतघरावर (फार्महाउस) आहे. माझ्या एनजीओचं कामही इथूनच सुरू आहे. या पद्धतीचं आयुष्य जगायला मला आवडतं. शूटिंग, शहर यातलं काहीही मी मिस करत नाहीय. खूप गोष्टी सुरू आहेत. अर्थकारण, समाजकारण, राजकारण याविषयी वाचनही करतोय. ० हिंदी सिनेमांची सध्या ओटीटीवर रांग लागली आहे, दाक्षिणात्य चित्रपट येत आहेत. या सगळ्यात मराठी सिनेमे मात्र कुठेही दिसत नाहीत असं का व्हावं? मला माहीत नाही. पण, एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी की शेवटी व्यवसाय आहे. खरं तर ओटीटी प्लॅटफॉर्मवाल्यांना हे विचारायला हवं की मराठी चित्रपट त्यांना का नकोयत. कदाचित प्रेक्षक मिळत नाहीत असा त्यांचा अनुभव असेल. शेवटी कुठलीही गोष्ट व्यवसायाशी संबंधित आहे. सिनेमा ही खर्चिक कला आहे. सिनेमांवर आपण काही गोष्टी लादतो, तेव्हा ती किती महागडी कला आहे हे खूपदा आपण विसरतो. पण, हे लक्षात ठेवायला हवं. ० मराठी नाटक ओटीटीवर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, नेटकसारखा प्रयोग सुरू झालाय. या प्रयोगांकडे तुम्ही कसे पाहता? नाटक कसं असावं यावर मी फार विचार नाही केलाय. फार पूर्वी स्क्रीनवर नाटक पाहिलंय. पण, मला असं वाटतं की ती एक तडजोड आहे. आता जी मंडळी हे करताहेत त्यांनाही हे ठाऊक असणार. त्यांचाही नाइलाज आहे म्हणून केलं जातंय. सध्या सगळेच अडकले आहेत. आताची परिस्थितीच वेगळी आहे. लगेच यावर काही बोलण्याची घाई नको. थोडी वाट पाहू या. मानवी आयुष्यात जे जे काही घडतं, त्या सगळ्यासाठी कोणत्याही कलाकृतीमध्ये स्कोप असलाच पाहिजे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30FvNvD