Full Width(True/False)

मालिका नियमांच्या चौकटीत; तरीही येणार 'हे' भन्नाट ट्विस्ट्स

'मोलकरीणबाई' या आमच्या मालिकेतील सर्व दृश्यांमध्ये सध्या सगळे कलाकार पूर्णवेळ मास्क लावून आहेत. आम्ही सेटवर सर्वतोपरी काळजी घेतोय. सॅनिटायझर वापरण्याचं, हात धुण्याचं महत्त्वही प्रत्येक पात्र आपापल्यापरीनं पटवून देत आहे. घरकाम करणाऱ्या स्त्रिया आणि त्यांचं भावविश्व हा 'मोलकरीणबाई' या मालिकेचा मूळ गाभा आहे. त्यामुळे या बायकांच्या लॉकडाउनमधील समस्या अधोरेखित करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे. आधीच नेहमी भासणारी पैशांची चणचण आणि त्यात आता लॉकडाउनमुळे बसणारे चटके ही घरकाम करणाऱ्या बायकांची सद्यस्थिती आम्ही दाखवली आहे. मालिकेतील मोलकरीणबाईचा आळशी नवरा लॉकडाउनमध्ये घरातील कामं करायला कशी शिकतो आणि मग त्याची कशी फजिती होते हे पाहताना गंमत येईल. मालिकेत नाट्यमय दृश्यांचा पुरेपूर वापर करून प्रेक्षकांचा कंटाळा आम्ही पळवून लावणार आहोत. लवकरच आई-मुलीच्या नात्यामधला एक वेगळा ट्विस्टही मालिकेत येणार आहे. अनेक बंधनांच्या चौकटीत बसणारे सीन्स सध्या लिहावे लागत आहेत. त्यामुळे निश्चितच विचार करण्यामध्ये थोडा अधिक वेळ जातोय. गेल्या तीन महिन्यांत खूप निवांत वेळ मिळाला आणि अनेक नवनवीन कल्पना सुचल्या. त्यांचा उपयोग आता लेखनात होतोय. पण अजूनही स्वयंपाक, घरकाम आणि लेखन अशी तिहेरी जबाबदारी निभावण्याची कसरत मी करत आहे.

मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी मिळाली असली, तरीही ते करताना अनेक नियम पाळावे लागत आहेत. आऊटडोअर सीन्सना बंदी आहे. त्याचबरोबर गर्दी-गोंधळ पूर्णपणे टाळावा लागत आहे. दृश्यांमध्येही सुरक्षित वावराचे नियम पाळायचे आहेत. दोन पात्रं एकमेकांच्या अजिबात जवळ येऊ शकत नाहीत. प्रेमी युगुलांचं नातं थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडवं लागणार आहे. हस्तांदोलन, मिठी याला पर्याय म्हणून प्रभावी संवादांचा वापर करण्यात आला आहे. तीन महिन्यांनंतर आम्ही मालिका रिस्टार्ट करतोय असं म्हणायला हरकत नाही. मधल्या काळात मालिकांचं फेरप्रक्षेपण प्रेक्षक पाहत होते. पण आता पुढच्या दीड-दोन महिन्यांसाठी एका नव्या समांतर ट्रॅकचा विचार मी केला आहे. सगळ्या नियमांना अनुसरुन मालिकेची कथा पुढे घेऊन जाणारा हा ट्रॅक असेल.

- चिन्मय मांडलेकर (राजा राणीची गं जोडी आणि जीव झाला येडा पिसा)

करोना या शब्दाला आणि त्यामुळे उद्भवलेल्या एकूणच परिस्थितीला खरं तर आता आपण सगळेच खूप कंटाळलो आहोत. म्हणून मालिकेत या गंभीर विषयाला हात घालणं टाळलं आहे. लॉकडाउननंतर 'अगंबाई सासूबाई'मधील भूमिकांना एक कलाटणी मिळणार आहे. बबड्या आणि आसावरी या पात्रांची दिशा पूर्णपणे बदललेली आहे. खलनायकाचं व्यक्तिमत्त्व बारकाव्यांसह रंगवून मग नायक-नायिकेची त्यावरची रंजक कुरघोडी दाखवली जाणार आहे. शिवाय अभिजित राजे आणि आसावरी यांची प्रेमकथाही आता अधिक फुलणार आहे. ही प्रेमकथेची सेकंड इनिंग पाहताना मजा येईल. प्रेक्षकांच्या डोक्याला अजिबात टेन्शन न देता हलक्याफुलक्या पद्धतीनं मनोरंजन करणार आहोत. दररोज प्रत्येक एपिसोडवर चर्चा करण्यासाठी किमान साडेतीन-चार तास आम्हा सर्व क्रिएटीव्ह टीमची ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्स चालते. प्रत्येक पात्राचा प्रवास आणि प्रसंगाची गंमत यांचा मेळ घालत खुमासदार सीन्स लिहिण्याचा आमचा प्रयत्न असतो. माझ्या बरोबरीनं पल्लवी करकेरा यासुद्धा मालिकेसाठी संवादलेखन करत आहेत.

-किरण कुलकर्णी, (अगंबाई सासूबाई )

सध्या लेखनाला नेहमीपेक्षा जास्त वेळ द्यावा लागत आहे. कारण आता आमच्या ऑफिसमध्ये मीटिंगज होत नाहीत. त्यामुळे चित्रीकरणाची आखणी करताना पूर्वी केलेली धमाल खूप मिस करतोय. गेल्या तीन महिन्यांत आम्ही सगळेच लेखक, दिग्दर्शक, कलाकार एका वेगळ्याच मनस्थितीतून गेलोय. त्यामुळे सर्वांना मिळून एक नवा सूर पकडायला कदाचित थोडा वेळ लागेल. 'वैजू नंबर वन' या मालिकेत लॉकडाउनच्या आधी आम्ही एक करोना विशेष भाग दाखवला होता. याच पार्श्वभूमीवर पुढे जात पोलीस हवालदारांच्या सत्कारानं नवी सुरुवात केली आहे. आपल्या सगळ्या पोलीस बांधवांचे मनःपूर्वक आभार आम्ही यानिमित्तानं मानू इच्छितो. योग्य ठिकाणी मास्क आणि सॅनिटायझरचा वापरही मालिकेत पाहायला मिळेल.

- चेतन सैंदाणे (वैजू नंबर वन)

'नवरी मिळे नवऱ्याला' या मालिकेत मुळात भरपूर पात्रं आहेत. शेतकरी, शिक्षक आणि डॉक्टर या तीन प्रमुख व्यवसायांचं प्रतिनिधित्व आमची तीन पात्रं करत आहेत. शिवाय एक बेरोजगार तरुणही आहे. या चारही जणांच्या आयुष्यात लॉकडाउनमुळे झालेला बदल विनोदी अंगानं दाखवणार आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न, पाण्याचा तुटवडा याबरोबरच ऑनलाइन शाळा आणि नवी शिक्षण प्रणाली या विषयांना धरून मालिका पुढे जाणार आहे. सध्या उद्भवलेली परिस्थिती ही आपण कुणी स्वप्नातही पाहिली नव्हती. त्यामुळे नव्या बदलांशी जुळवून घेताना थोडं जड जातंय. आमच्या मालिकेत मोठं एकत्र कुटुंब आहे. पण आता सगळे सदस्य एकाच वेळी पडद्यावर येऊ शकत नाहीयत. प्रत्येक भागात प्रेक्षकांचं औत्सुक्य वाढेल असं हट के काहीतरी करावं लागत आहे. पहिल्याच भागात आमचं एक पात्र अंगणातल्या झाडाला त्याच्या मनातल्या गोष्टी सांगत आहे, अशी सुरुवात केली. हे नवे बदल कलाकारांबरोबर प्रेक्षकांच्याही लवकरच अंगवळणी पडतील असं वाटतंय.

- समीर पाटील (नवरी मिळे नवऱ्याला)

माझ्या दोन्ही मालिकांमध्ये लॉकडाउनच्या आधी भन्नाट ट्विस्ट येणार होते. आता पुन्हा नव्यानं सुरुवात करताना हे महत्वाचे ट्विस्ट आणखी परिणामकारकरित्या घेता येणार आहेत. 'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये राधिका, शनाया आणि माया या तिघी मिळून गुरुनाथला धडा शिकवणार, हा ट्रॅक मजेशीर वळणं घेत पुढे जाणार आहे. शनायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनील परत आली आहे म्हणून प्रेक्षक खुशीत आहेत. पण, सध्या ज्येष्ठ कलाकार आणि बालकलाकारांना बाजूला ठेवून सीन्स लिहावे लागत आहेत. त्यामुळे मालिकेतील अथर्व, नाना, बाबा ही पात्रं पुढचे काही दिवस तरी तुमच्या भेटीला येणार नाहीत. 'रंग माझा वेगळा' या मालिकेच्याबाबतीत आम्ही खरंच नशीबवान आहोत असं म्हणायला हवं. कार्तिक आणि दीपा या आमच्या नायक-नायिकेचं लग्न होणार होतं. तितक्यात लॉकडाउनची घोषणा झाली. पण, लग्नाचं शूटिंग आधीच झालं होतं म्हणून ते भाग आम्ही आता दाखवू शकतो. एपिसोड्सचं एडिटिंग राहिलं होतं म्हणून ते भाग मार्च महिन्यात दाखवले गेले नाहीत. पण आता प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी लग्न या प्रमुख वळणावर वापरलेल्या ठसठशीत नाट्याचा उपयोग होतोय. पुढचे भाग लिहिताना थोडी कसरत करावी लागत आहे. पण नावीन्यपूर्ण मार्ग काढण्याचीही आता सवय करून घेतली आहे.

- अभिजित गुरू (रंग माझा वेगळा, माझ्या नवऱ्याची बायको)

लॉकडाउनमध्ये प्रेक्षकांनी हास्यजत्रेचं फेरप्रक्षेपण आवडीनं बघितलं. आमच्या धमाल स्कीट्सचा भरभरून आनंद घेतला. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यांचं सकस मनोरंजन करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. आता आठवड्यातले चार दिवस एक फ्रेश सरप्राइज घेऊन आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहोत. खरं तर लॉकडाउनच्या दुर्दैवी परिस्थितीतून आपण सगळे जात आहोत. पण ही परिस्थिती साहित्यासाठी पोषक म्हणावी अशी आहे. आजुबाजूला घडणाऱ्या प्रसंगांचं चित्रण आमच्या वेगवेगळ्या स्किट्समधून दिसणार आहे. आपल्याच जीवनातली विसंगती सादरीकरणात दिसली, की प्रेक्षकांना हसू येतं. प्रत्येक स्किट लिहिण्याची आमची प्रक्रिया तासनतास चालते. सध्या व्हिडीओ कॉन्फरन्सवर आम्ही सगळे लेखक एकत्र चर्चा करतो. समीर-विशाखा, प्रसाद-नम्रता या हास्यजत्रेतल्या ठरलेल्या नेहमीच्या जोड्या आहेत. त्यांची पात्रं निरनिराळ्या अंगांनी वळवून घटनात्मक विनोदनिर्मिती साधण्याचा आमचा प्रयत्न असतो. 'हास्यजत्रा' हे एक कुटुंब आहे. प्रत्येक जण एकमेकांना दिलखुलास दाद देत सगळ्या स्किट्ससाठी योगदान देत असतो. येत्या भागांमध्ये जोड्यांची अनपेक्षित कॉम्बिनेशन्स एकत्र येऊन आम्ही सेटवर कल्ला करणार आहेत.

- सचिन गोस्वामी (महाराष्ट्राची हास्यजत्रा)

संकलन - गौरी आंबेडकर



from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZMRXN7