मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतनं केलेल्या आत्महत्येच्या तपासात बॉलिवूडमधील एका बड्या सिनेनिर्मिती संस्थेशी सुशांतच्या असलेल्या काँट्रॅक्टची चर्चा जोरात आहे. सुशांतचा पहिला चित्रपट 'काय पो छे' हिट झाल्यांनतर याच चित्रपटाच्या निर्मतीसंस्थेनं सुशांतशी तीन चित्रपटांचं काँट्रॅक्ट साइन केलं होतं. या अंतर्गत सुशांतनं '' आणि ' हे चित्रपट केले. परंतु, काँट्रॅक्टमध्ये समाविष्ट असलेला तिसरा सिनेमा 'पानी' पुढे तयार होऊ शकला नाही. दुसरीकडे असंही बोललं जातंय की, या एका काँट्रॅक्टमध्ये अडकल्यामुळे सुशांतला त्यावेळी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा 'गोलियों की रासलीला, रामलीला ' हा चित्रपट करता आला नव्हता. काँट्रॅक्टमधील 'पानी' चित्रपटासाठी मेहनत घेऊन, पूर्वतयारी करूनही निर्मिती संस्थेनं तो सिनेमा बनवायला असमर्थता दर्शवली होती. सुशांत असा एकटाच कलाकार नाही. निर्मितीसंस्थांनी अशा प्रकारे काँट्रॅक्ट करूनही चित्रपट केला नाही, किंवा इतर कुठल्या चित्रपटात काम करू दिलं नाही असं अनेक कलाकारांच्या बाबतीत होतंय. बॉलिवूडमध्ये असे अनेक नवोदित कलाकार आहेत, जे काँट्रॅक्टच्या विळख्यात अडकले असून; त्यांच्या काँट्रॅक्टमधील सिनेमा चित्रित होत नाहीय आणि त्यांना इतर चित्रपटातह कामही करता येत नाहीय. म्हणूनच सुशांतच्या आत्महत्येनंतर काँट्रॅक्टची चर्चा पुन्हा जोर धरु लागली आहे. काँट्रॅक्टचं करायचं काय? अभिनेता रणवीर सिंह, परिणीती चोप्रा, अर्जुन कपूर यासारख्या कलाकारांचंही पदार्पणावेळी निर्मिती संस्थेशी तीन सिनेमांचं काँट्रॅक्ट होतं. श्रद्धा कपूर, रिया चक्रवर्ती, ताहीर राज भसीन यांनीही कॉन्ट्रॅक्ट निर्मिती संस्थेशी तीन चित्रपटांचं काँट्रॅक्ट केलं होतं. परंतु, त्यांच्यासाठी हे कॉन्ट्रॅक्ट पुढे बंदिस्त होऊन पडलं. अभिनेत्री श्रद्धा कपूरनं दोन वर्ष प्रतीक्षा केल्यानंतर संबंधित काँट्रॅक्ट मोडून 'आशिकी २' चित्रपट केला. पण, दुसरीकडे २०१४मध्ये 'मर्दानी' सिनेमानंतर अभिनेता ताहीर राजला मिळालेल्या तीन चित्रपटांच्या काँट्रॅक्टमध्ये इतक्या वर्षांनंतर अद्यापही तो अडकला आहे. आपला पुढचा चित्रपट सुरू होण्याची तो वाट पाहतोय. कॉन्ट्रॅक्टच्या बंधनात अडकल्यामुळे अनेकदा काँट्रॅक्टमधील सिनेमा होत नसतानाही त्या कलाकाराला इतर निर्मिती संस्थेसोबत काम करता येत नाही. काँट्रॅक्टच्या विरोधात जाऊन इतर संस्थेसोबत काम करायचं असेल तर; कलाकाराला मोठी रक्कम नुकसानभरपाई म्हणून अगोदरच्या निर्मिती संस्थेला द्यावी लागते. त्यामुळे स्वप्नवत असणारं हे काँट्रॅक्ट अनेकदा कलाकारांसाठी डोकेदुखीदेखील ठरतं. कलाकार आणि निर्माता हे दोघेही आपापला फायदा लक्षात घेऊनच काँट्रॅक्ट साईन करत असतात. तीन सिनेमांचं एकत्र कॉन्ट्रॅक्ट करण्यामागे निर्मती संस्थेचा विचार असा असतो की, पहिल्या सिनेमातून मिळालेल्या लोकप्रियतेचा फायदा त्यापुढचा सिनेमा करताना त्याच निर्मिती संस्थेला मिळावा. - गिरीश जोहर, ट्रेंड अॅनालिस्ट मराठीत सिनेविश्वात काय? मराठी सिनेसृष्टीत सिनेनिर्माते आणि कलाकार यांच्यामध्ये बॉलिवूडप्रमाणे सिनेमा पॅकेजचा करार होत नाही. मुळात मराठी चित्रपटांची निर्मितीमूल्यं आणि केवळ कलाकाराच्या स्टारडमवर चित्रपट चालण्याची बॉलिवूडसारखी गणितं इथे नसल्यामुळे निर्माते कलाकारांशी एक-एक चित्रपटाचं काँट्रॅक्ट करतात. त्यामुळे मराठी सिनेविश्वात नवोदित कलाकारांना एकावेळी दोन वेगवेगळ्या निर्मिती संस्थांसोबत काम करण्याची परवानगी असते. परंतु, हेच चित्र मराठी टीव्हीविश्वात नाहीय. रिअॅलिटी शोमध्ये लोकप्रिय झालेल्या कलाकारांना टीव्ही वाहिन्या काँट्रॅक्टमध्ये बांधून टाकतात. ज्यात त्या संबंधित कलाकाराला केवळ त्या वाहिनीच्या मालिकांमध्येच काम करण्याची मुभा असते. इतर वाहिन्यांच्या मालिकेत त्यांना काम करता येत नाही. एक मालिका सुरू असताना दुसऱ्या वाहिनीच्या मालिकेत किंवा इतर कोणत्याही सिनेमातही काम करता येत नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Z7MvUA