Full Width(True/False)

बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा वाद संपेना; आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला कायम

इंडस्ट्रीतली घराणेशाही, गटबाजी, मूव्ही माफिया यावरुन बॉलिवूडमध्ये रोज वादांचा नवा 'सिनेमा' होताना दिसतोय. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अनुभव सिन्हांच्या ताज्या 'राजीनाम्या'नंतर तर नाराजी, वादांचा 'ब्लॉकबस्टर'च पाहायला मिळतोय.एकीकडे चित्रपटगृहं कधी सुरू होणार याविषयीची अनिश्चितता संपायचं नाव घेत नसताना बॉलिवूड मात्र वादांनी ढवळून निघालं आहे. नेपोटिझम, गटबाजी या विषयांवरुन आरोप-प्रत्यारोप करत एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत. कंगना रनौट, आलिया भट, अनुराग कश्यप, करण जोहर, तापसी पन्नू ही नावं सातत्यानं चर्चेत येत आहेत. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी 'बॉलिवूडचा राजीनामा' दिल्यानंतर तर या वादाला नवी उकळी फुटली आहे. वादाच्या या चित्रपटावर टाकलेली एक नजर.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगना रनौट सातत्यानं बॉलिवूडमधील घराणेशाही आणि मूव्ही माफियांविषयी बोलतेय. याचसंदर्भात अनुराग कश्यपनं एक ट्विट केलं आहे. तो लिहितो, 'यश आणि सामर्थ्याची भुरळ प्रत्येकाला पडते. मग ती व्यक्ती इनसाइडर असो की आउटसाइडर. 'माझ्याकडून शिका, माझ्यासारखे बना', हे मी २०१५ पूर्वी कंगनाच्या तोंडून कधीच ऐकलं नव्हतं. आता, जो माझ्याबरोबर नाही तो प्रत्येक जण स्वार्थी आहे; असं कंगनाला वाटतंय.' कंगनाचं कौतुक करणाऱ्यांबद्दल म्हणतो, 'कंगनाला आरसा दाखवण्याऐवजी उलट तिला डोक्यावर घेऊन तुम्ही तिलाच संपवत आहात.' लोक कंगनाचा वापर करत असल्याचा आरोपही अनुरागनं केला आहे. तो ट्विटमध्ये म्हणतो, 'प्रत्येक जण तुझा वापर करतोय आणि आज तुझं स्वतःचं असं कुणीच नाही.' यावर टीम कंगनानं लिहिलंय, की 'हे मिनी महेश भट्ट कंगनाला सांगताहेत की, ती अशा मतलबी लोकांनी वेढलेली आहे जे तिचा वापर करत आहेत. पण, तुम्ही आता मूव्ही माफियांचा बचाव करत आहात.'

एका मुलाखतीत कंगनानं समांतर चित्रपटांच्या संकल्पनेची सुरुवात कलाविश्वात आपणच केल्याचा दावा तिनं केला होता. अभिनेत्री स्वरा भास्करनं यावर प्रतिक्रिया देताना आपल्या उपरोधात्मक ट्विटमध्ये लिहिलं, '१९५५ मध्ये 'पाथेर पांचाली' या चित्रपटाबरोबर कंगना यांनी समांतर सिनेमाची सुरुवात केली. २०१३ मध्ये त्यांनी 'क्वीन'पासून स्त्रीवादाची सुरुवात केली. पण, या साऱ्याच्याही आधी त्यांनी १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं.' तिचं हे ट्विट पाहून कंगनानंही स्वरावर आगपाखड केली. 'प्रिय स्वरा, तुमच्यापैकी कुणीही भारतीय चित्रपटांच्या सुवर्णयुगात जन्मालाही आलं नव्हतं. स्त्रीवाद आणि समांतर सिनेमाची सुरुवात 'क्वीन'पासूनच सुरू झाली होती. जर असं झालं नव्हतं, तर मग हे सारं केव्हा झालं होतं?', असं कंगनानं लिहिलंय.

सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा वाद आणखी चिघळला. स्टारकिड असूनही अभिनेता अभय देओलनं नेपोटिझमबद्दल मत मांडलं. तो म्हणाला, 'बॉलिवूडमध्ये घराणेशाही कित्येक दशकांपासून सुरू आहे. मात्र याविरोधात बोलण्यासाठी कुणीही पुढे धजावत नाही. उलट त्यात सहभागी होण्यासाठी तयार होतात. मी हे बोलू शकतो कारण मी एका फिल्मी कुटुंबात लहानाचा मोठा झालो आहे. बालपणी दुसऱ्यांकडून ऐकत होतो. पण जेव्हा मी इंडस्ट्रीत आलो तेव्हा स्वतः हे पाहिलंही.'

नव्वदच्या दशकातील लोकप्रिय स्टार गोविंदानं बॉलिवूडमधील घराणेशाहीबाबत म्हटलं की, त्याचे वडील अरुणकुमार राजा आणि आई निर्मला देवी कलाकार होते. तरीही त्याला बॉलिवूडमध्ये जम बसवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. गोविंदाने म्हणाला, की, 'माझ्या काळात निर्मात्यांना भेटण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागत होती. बॉलिवूडमध्ये गट आहेत आणि चार ते पाच लोकच बॉलिवूड चालवत आहेत. ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे त्याला पूर्वी काम मिळत होतं. प्रत्येक सिनेमाला थिएटरमध्ये एकसारखी संधी मिळत होती. मात्र, आता असं राहिलेलं नाही. आता चार-पाच लोक असे आहेत जे सिनेमांचा व्यापार चालवतात. सिनेमे चांगल्या पद्धतीनं प्रदर्शित करायचे की नाही हे तेच लोक ठरवतात. माझे काही चांगले चित्रपट अशाच टोळक्यामुळे चांगल्या पद्धतीनं प्रदर्शित झाले नाहीत.'

'तुम्ही स्टारकिड असाल किंवा तुम्हाला चित्रपटक्षेत्राची पार्श्वभूमी असेल, तर इंडस्ट्रीत तुम्हाला जास्त स्ट्रगल करावं लागत नाही. इंडस्ट्रीच्या बाहेरुन आलेल्यांना फार मेहनत घ्यावी लागते, स्वतःची ओळख बनवावी लागते. अनेक बॉलिवूड दिग्दर्शकही ओळखीच्या सेलिब्रिटींना काम देतात. बाहेरून आलेल्यांना संधी मिळत नाही. मलाही काही चित्रपट गमवावे लागलेत', असं तापसी पन्नूनं म्हटलं आहे. बाहेरुन आलेल्या प्रत्येक कलाकारानं हे समजून घ्यावं की, कौशल्य असलं तर तुम्ही नक्की यशस्वी होणार, असंही ती म्हणते.

घराणेशाही फक्त बॉलिवूडमध्येच नव्हे तर सगळ्या क्षेत्रात आहे, असं सांगत दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी इंडस्ट्रीत काही बदल होत असल्याचं म्हटलंय. ते म्हणाले, "इंडस्ट्रीमध्ये घराणेशाही, मक्तेदारी, गटबाजी या सर्व गोष्टी आहेत. 'चांदनी बार' ते 'इंदू सरकार' असे चित्रपट आणून मी माझ्या ताकदीवर इंडस्ट्रीत उभा आहे. मी माझ्या मूल्यांना अनुसरून काम केलं. इंडस्ट्रीतल्या दिग्गज कलाकारांना मी नेहमी सांगत आलोय, की नवीन प्रतिभेला पायदळी तुडवू नका. नाण्याच्या दोन्ही बाजू बघायला पाहिजेत. सुशांत, शाहरुख आणि माझ्यासारखे लोक या इंडस्ट्रीत आहेत. दुसरीकडे असेही स्टारकिड्स आहेत, जे यशस्वी ठरले नाहीत. इथे गटबाजी होत असते. एखाद्याच्या चित्रपटाला खाली कसं पाडायचं हे सर्व इथे चालतं. माझ्या चित्रपटांमधून मी हे सत्यसुद्धा मांडलंय. घराणेशाही पुढेही राहणार.'

माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत मनोज वाजपेयी म्हणाला होता, की 'सेलिब्रिटी जर लोकांनी केलेलं कौतुक ऐकत असतील, तर त्यांनी केलेली टीकासुद्धा ऐकली पाहिजे. तुमच्याविरोधात असंतोष असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागणार आहे. माझा चित्रपट लोक हिट करत असतील तर जेव्हा हेच लोक मला प्रश्न विचारतील, तेव्हा त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठीही मी बांधील आहे.'



from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2D81s0n