दिवाळीला सुरुवात होत असताना आनंद-उत्साह आणि सकारात्मकतेचं वातावरण तयार होतंय. नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवणाऱ्या आदेश बांदेकर यांनी गेली अनेक वर्षं काम करताना रक्तापलीकडची नाती जपली. दिवाळीच्या निमित्तानं या नात्यांच्या अनुभवाविषयी ते सांगताहेत. स्वतःसाठी जगत असताना, दुसऱ्यांसाठीही जगायचं; असा विचार मनाशी बाळगून आजवर मी काम करत आलोय. यापुढे देखील ते तसंच सुरू राहील. आज मी स्थिरावलो असलो, तरी माझ्या स्ट्रगलच्या काळात मी आणि माझी पत्नी सुचित्रा नेहमी आशावादी होतो. सकारात्मकतेनं आम्ही आमचा मार्ग निवडत होतो. पुढे हळूहळू पावलं टाकत होतो. उराशी बाळगलेल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी धडपडत होतो. कुणाकडे काही मागायचं नाही, कुठलीच अपेक्षा करायची नाही.
दिवाळीला सुरुवात होत असताना आनंद-उत्साह आणि सकारात्मकतेचं वातावरण तयार होतंय. नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवणाऱ्या आदेश बांदेकर यांनी गेली अनेक वर्षं काम करताना रक्तापलीकडची नाती जपली. दिवाळीच्या निमित्तानं या नात्यांच्या अनुभवाविषयी ते सांगताहेत. स्वतःसाठी जगत असताना, दुसऱ्यांसाठीही जगायचं; असा विचार मनाशी बाळगून आजवर मी काम करत आलोय. यापुढे देखील ते तसंच सुरू राहील. आज मी स्थिरावलो असलो, तरी माझ्या स्ट्रगलच्या काळात मी आणि माझी पत्नी सुचित्रा नेहमी आशावादी होतो. सकारात्मकतेनं आम्ही आमचा मार्ग निवडत होतो. पुढे हळूहळू पावलं टाकत होतो. उराशी बाळगलेल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी धडपडत होतो. कुणाकडे काही मागायचं नाही, कुठलीच अपेक्षा करायची नाही.
जे आपल्या हातात आहे त्यात समाधान मानायचं
जे मिळेल त्यात समाधान मानायचं; या मताचा मी आणि सुचित्रा दोघेही होतो आणि आहोतचही. कारण, जो समाधानी असतो तो सुखी असतो. पण, जर एखादा म्हणतो की, 'मी सुखी आहे. परंतु, समाधानी नाही.' तर तो सुखी कसा असेल? असा प्रश्न नेहमी मला पडतो. त्यामुळे जे आपल्या हातात आहे. त्यात समाधान मानायचं. जे मिळालं त्यात समाधानी राहायचं आणि आनंदानं आजचा दिवस हसतखेळत; स्वतःसाठी आणि दुसऱ्याच्या आनंदासाठी ही आनंदयात्रा घेऊन पुढे चालत राहायचं हे मनाशी निश्चित केलं आहे. पण, असेच आनंदमय दिवस सुरु असताना काही अपरिचित गोष्टी नकळतपणे घडतात.
संकट कुणाला सांगून येत नाही
संकट काही कुणाला सांगून येत नाही. पण, प्रत्येक गोष्टीकडे आपण सकारात्मक दृष्टीकोन ठेवून जगायचं; असं 'होम मिनिस्टर'च्या प्रत्येक भागानं मला शिकवलं आहे. गिरणगावातील अभ्युदयनगमधील चाळीत मी लहानाचा मोठा झालो. नाती ही कशी जपायची? हे मला त्या अभ्युदयनगरच्या बिल्डिंग नंबर ५ मधील नव्वद घरांतील वेगवेगळ्या मावशींच्या संस्कारातून शिकायला मिळालं. समोर आलेली प्रत्येक जबाबदारी, कामाला देव मानून मी सतत काम करत राहिलो.
आजवरच्या प्रवासानं खूप काही दिलं
या प्रवासात वेगवेगळे टप्पे आणि संकटं ओलांडून स्वतःबरोबर इतरांना पुढे घेऊन जात चालत राहिलो. दूरदर्शनपासून सुरू झालेला प्रवास एका प्रसिद्ध मराठी वाहिनीच्या कार्यालयापर्यंत पोहोचला. गेली सतरा वर्ष 'होम मिनिस्टर' हा कार्यक्रम करत असताना राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विभागात मी माझं काम सातत्यानं सुरू ठेवलं. माझ्या आजवरच्या प्रवासानं मला काय दिलं? असं कोणी मला विचारलं तर मी सांगतो; 'मला रक्तापलीकडची नाती दिली!' या नात्यांनी मला माझ्या संकटप्रसंगी आधार दिला. त्यामुळे त्यांचा मी कायम ऋणी राहीन.
संकटात रक्तापलीकडची नाती धावून येतात
गेल्या आठ महिन्यांचा करोनाचा काळ आपल्या सर्वांसाठी संकटमय काळ आहे. 'माझं कुटुंब, माझी जबाबदारी' हे ब्रीदवाक्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दिलं आहे. मी माझ्या कुटुंबाची जबाबदारीनं खबरदारी घेत होतो. पण, माझ्या कुटुंबावर आलेलं संकट दूर करण्यासाठी जेव्हा रक्तापलीकडची नाती धावून येतात, तेव्हा मनाला समाधान वाटतं. त्याचं झालं असं, एकदा अचानक माझा फोन खणाणला. माझा लहान भाऊ नागेश याचा तो कॉल होता. एका मोठ्या आरोग्य संकटातून उपचार घेऊन नुकताच तो उभा राहिला होता.
भावावर याआधी झाली दोनदा शस्त्रक्रिया
यापूर्वी दोन वेळा त्याच्यावर शस्त्रक्रियादेखील झाली होती. पण, आता पुन्हा त्याच्या पोटात भयंकर दुखू लागलं होतं. तो काळ असा होता, की जेव्हा मुंबईत करोनानं अगदी उच्चांक गाठला होता. या अशा परिस्थितीत नागेशवर पुन्हा कसे उपचार करायचे हा प्रश्न मला सतावत होता. आमच्या कुटुंबासाठी देव असलेल्या डॉ. श्रीखंडे आणि डॉ. नांदे यांच्याशी संपर्क साधला. नागेशवर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार होती.
एका क्लिनिकमध्येच केली शस्त्रक्रिया
करोनाच्या काळात, लॉकडाउन असताना अशी मोठी शस्त्रक्रिया कशी करायची याचा विचार मी करत होतो. मी बॉम्बे हॉस्पिटलमधील मित्र संजय सावंत मदतीसाठी धावून आले. रुग्णालयात नागेशला भरती केलं आणि डॉ. नांदे, डॉ. रसिक येथे नागेशची तपासणी करण्यासाठी पोहोचले. डॉक्टरांनी मला विश्वास दिला की, आपण या संकटातून बाहेर पडू. पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची तयारी डॉक्टरांनी दर्शवली. हिंदु कॉलनीतील एका क्लिनिकमध्ये शस्त्रक्रिया करण्याचं ठरलं. त्यावेळी डॉक्टरांसोबत मदतीला त्यांचे सहकारी, परिचारिका असणंदेखील गरजेचं होतं.
भावाची तब्येत सतत बिघडत होती
आता लॉकडाऊनच्या काळात सर्वांना एकत्र जमवण्यासाठी आमची धावपळ सुरू झाली. हे सगळे वसई, विरार असे दूरदूरच्या ठिकाणी राहणारे होते. त्यांना दादरला घेऊन यायचं होतं. एकीकडे नागेशची तब्येत अधिक बिघडत होती. आम्ही तातडीनं प्रशासनाकडून प्रवासाची परवानगी काढली आणि सर्वांना एकत्र घेऊन येण्याची योजना आखली. वसईमधील माझा सहकारी निलेश तेंडुलकर देवासारखा मदतीसाठी धावून आला. निलेशनं वसईमधील परिचारिकांना मुंबईत घेऊन येण्याची जबाबदारी घेतली.
माझ्यासाठी सारे देवासारखे धावून आले
सर्व परिचारिका, डॉक्टर आणि माझे मित्र हे माझ्यासाठी देवासारखे धावून आले. माझ्या कुटुंबाला स्वतःचं कुटुंब समजून ते मदतीसाठी पुढे आले. चौदा तास शस्त्रक्रिया चालली. ऑपरेशन थिएटरमधून डॉ. नांदे यांच्या डोळ्यात मी पाहिलं. त्यांनी हाताचा अंगठा दाखवून मला खुणावलं. आज नागेश सुखरुप आहे. माझ्या रक्ताच्या पलीकडील नात्यांनी माझ्या रक्ताच्या नात्याला बळ दिलं, असं मी म्हणेन. सर्व रक्तापलीकडील नात्यांना माझा साष्टांग नमस्कार आहे. कारण, ही, मंडळी स्वतःच कुटुंबापासून दूर राहून बाहेर आपल्यासाठी कार्यरत आहेत.
आई असती तर तिनेही हेच केलं असतं
त्या दिवशी शस्त्रक्रियेच्या वेळी नर्सला इकडे-तिकडे तत्परतेनं धावपळ करताना पाहून तिच्यात माझी आई दिसली. आईनं देखील ३५ वर्ष नर्स म्हणून अनेकांशी शुश्रूषा केली आहे. ती आज असती तर, तीदेखील असंच आजच्या संकटप्रसंगी दुसऱ्यांच्या मदतीला धावून गेली असती. तेव्हा अशा असंख्य मदतीच्या हातांना आदेश बांदेकरचा हात जोडून मनापासून नमस्कार आहे. गणपती बाप्पा मोरया! सिद्धिविनायकाच्या चरणी हीच प्रार्थना राहील की, सर्वांना निरोगी, आनंदी आणि समाधानी ठेव. सर्वांची दिवाळी सुख-समाधानाची आणि आनंदाची जाऊ दे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32C3EHl