मी शिकायला पुण्यात होते. त्या काळातल्या आठवणाऱ्या गोष्टी म्हणजे मी पेइंग गेस्ट म्हणून राहत असलेली खोली. त्यासह स्वभाव जुळणारी माझी रुममेट, त्या खोलीत असलेली माझ्या उंची इतकी एक खिडकी, खिडकीच्या बाजूला असलेली माझी कॉट. शेवटचा मजला असल्यामुळे काँक्रिट जंगल नव्हे तर हिरवळ पसरलेल्या मॉडेल कॉलनीचं सुंदर दृश्य दिसत असे. चतुःश्रुंगीचा डोंगर आणि अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर कॉलेज असूनही रोज उशिरा पोहोचणारी मी! रोज कॉलेज संपलं की, बाकीची मंडळी जरी फिरायला बाहेर पडली तरीही मी मात्र घरी वेळेत पोहोचायचा प्रयत्न करायचे. कारण मला 'सांज ये गोकुळी' हे गाणं ऐकता-ऐकता सूर्य मावळताना पाहायचा असायचा. 'पर्वताची दिसे दूर रांग' ही ओळ ऐकताच माझ्या डोळ्यांत कधी-कधी पाणीही यायचं. इतकं सुंदर दृश्य जे पूर्वी मी फक्त काही फॅमिली ट्रीपमध्ये काहीच दिवसांसाठी अनुभवलं होतं. ते आता माझ्या आयुष्याचा भाग बनलं आहे, हे त्या गाण्याच्या बोलांनी आणि त्या बोलांचा अर्थ सांगणाऱ्या त्या दृश्यानं मला पटवून दिलं. त्यापूर्वी निसर्गाशी इतकी जवळीक कधीच साधली गेली नव्हती. मी रात्री चेहऱ्यावर पडलेल्या प्रकाशात आकाशाकडे बघत-बघत झोपी जायचे. पण, दिवसभरात काय-काय घडलं हे मी झोपण्यापूर्वी काही चांदण्यांना सांगायचे. जणू काही मी त्यांना आमच्या पृथ्वीवर काय-काय असतं आणि चांगल्या व काही रुसवणाऱ्या गोष्टी याचा वृत्तांत न चुकता देत असे. मी माझ्याही नकळत निसर्गाशी समरस होऊन गेले. कधी-कधी आपलं ऐकून घेण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी अशा काही गोष्टींचा आपल्याला आधार मिळतो. ज्या न बोलताही, बोलणाऱ्यांपेक्षा जवळच्या होऊन जातात. पृथ्वीला तिच्या काळोखाच्या क्षणी मदतीला धावून आलेला चंद्र, त्याच्या मंद प्रकाशात मलाही हसवायचा. मी एका कवयित्रीसारखी बोलतेय असं म्हणाल, पण या निसर्गाशी जेव्हा जवळचा संबंध येतो तेव्हा प्रत्येक शब्दाचं काव्यात रूपांतर होतंच! आजकालच्या सोशल मीडियाच्या काळात आपल्याला व्यक्त होण्यासाठी बरेच मार्ग उपलब्ध आहेत. जे उत्तम आहेतच. जरी आपण स्वतंत्र असलो तरीही लोक काय म्हणतील या विचारांच्या पारतंत्र्यात असल्यासारखे, लोकांना जे पटेल अशाच आपल्याबद्दलच्या गोष्टी समोर आणतो. आपण खरे कसे आहोत, आपल्या भावना एकांतात, आपलं खरंच ऐकून घेणाऱ्या लोकांत व्यक्त करता आल्या तर नक्कीच सुख आणि दुःखं हे खऱ्या अर्थाने शेअर करता येतील. या जगात माझ्या मते, बोलणारे फक्त आपण मनुष्यच आहोत. पण, ऐकणारे इतर अनेक आहेत. जे आपल्याकडून आपल्या गोष्टी मनापासून ऐकू इच्छितात. मी फक्त चांदण्यांशीच नव्हे तर प्राण्यांशी, घराशी, झाडांशीही बोलते. काही लोक मला वेडं म्हणतील. पण, शहाणं असणं म्हणजे तरी नक्की काय हे गूढच आहे. आपल्या आयुष्यात आपण आनंद कसा मिळवायचा हे आपलं आपणच ठरवायचं असतं, नाही का?


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hgRGZP