Full Width(True/False)

मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात कमी पडतोय का? गीतांजली कुलकर्णी म्हणतात...

गौरी आंबेडकर, एसएनडीटी विद्यापीठ ० '' मधील सुशीला शेखर या व्यक्तिरेखेविषयी काय सांगाल?- मी साकारत असलेली सुशीला शेखर ही एक धाडसी आणि करारी पोलिस अधिकारी आहे. इथे एक अभिनेत्री म्हणून माझ्याकडून नैसर्गिक आणि कलाकृतीतील नाट्य टिकवून ठेवणारा, अशा दोन्ही प्रकारचा अभिनय एकाच वेळी अपेक्षित होता. सुशीला ही आक्रमक आणि ध्येयवेडी आहे. तिची मानसिकता अधोरेखित करण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आहे. ० सुशीला शेखर आणि या दोघींमध्ये काही साम्य आहे का?- खरं तर मी अजिबातच तशी नाही. माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध व्यक्तिरेखा असल्यामुळे आपण जे नाही आहोत, ते साकारायला मिळालं. आव्हान होतं; पण तितकीच मजाही आली. ० ओटीटी (ओव्हर द टॉप) या माध्यमाला सेन्सॉरशिप असावी का?- जे पाहण्यावर बंधनं घातली जातात, त्याबाबत अधिक कुतूहल निर्माण होतं. मग हे कुतूहल शमण्यासाठी वेगवेगळ्या वाटा शोधून काढल्या जातात. आपल्याकडे हाणामारी, हिंसाचार आणि लैंगिकता असलेला आशय सर्वाधिक पाहिला जातो. या निरीक्षणाचा मूळ स्रोत शोधून काढणं खूप गरजेचं आहे. कलेविषयी जागरूकता निर्माण करायला हवी. मला असं वाटतं कोणत्याही माध्यमाला सेन्सॉरशिप नसावी. आपण प्रेक्षक म्हणून सेल्फ सेन्सॉरशिपचा अवलंब करायला हवा. एक सुजाण प्रेक्षक या नात्यानं काय बघायचं याबाबतचा निर्णय घेण्यासाठी प्रत्येक जण सक्षम आहे. ० वेब सीरिज आणि चित्रपट यांच्यातील स्पर्धेत कोण वरचढ ठरेल?- सिनेमागृहात जाऊन मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहणं हा एक विलक्षण अनुभव आहे. हा अनुभव घरी बसून छोट्या स्क्रीनवर घेता येणं शक्य नाही. आपल्या घराच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून चित्रपटगृहांकडे वळण्यासाठी प्रेक्षकांना कदाचित थोडा वेळ लागेल. कदाचित चित्रपटाचं रूप नवा आकार घेईल. पण तरीही वेबविश्व आणि चित्रपट ही समांतर माध्यमं आहेत आणि ती प्रेक्षकांच्या मनात आपापलं स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरतील. ० येत्या काळात तुम्ही मराठी चित्रपटात दिसणार आहात का?- मध्यंतरी मी 'कारखानिसांची वारी' हा एक मराठी सिनेमा केला. या चित्रपटाचं आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये खूप कौतुक होतंय. आपल्याकडे हा चित्रपट लवकरच प्रदर्शित व्हावा, अशी इच्छा आहे. 'गोष्ट आहे पृथ्वीमोलाची' या सीरिजमधील 'अर्जुनची गोष्ट' या भागात मी काम केलं आहे. मानसिक आरोग्य हा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी झटणाऱ्या सीरिजचा भाग होता आलं, याचा आनंद आहे. ० मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात कमी पडतोय का?- इतर राज्यांमध्ये प्रत्येक सामाजिक स्तरातील व्यक्ती स्थानिक चित्रपट पाहण्याला पसंती देते. टपरीवरचा चहावाला आणि उच्चपदस्थ अधिकारी हे दोघेही तितक्याच आवडीनं सिनेमाचा आस्वाद घेतात. मराठी प्रेक्षक मराठी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांकडे का वळत नाही, यावर अभ्यास व्हायला हवा. यामागची कारणं शोधली की मग उपयोजना करणं शक्य होईल. ० टाळेबंदीच्या काळात मिळालेल्या मोकळ्या वेळेत तुम्ही काय केलं?- मी कुटुंबियांसह गावाला होते. तिथे गावातल्या लहान मुलांबरोबर मी रमले. मुलांना गोष्टी सांगणं, त्यांना स्वतःच्या गोष्टी तयार करण्यासाठी प्रवृत्त करणं, त्यांचे नवनवीन खेळ घेणं असं सगळं करत होते. पाळीव प्राण्यांचे भरपूर लाड केले. यादरम्यान झाडं लावायला आणि झाडांची निगा राखायला भरपूर वेळ आणि जागा मिळाली. स्वतःमधल्या चित्रकारालाही पडताळून पाहिलं. मला विशेष न आवडणारा स्वयंपाकही लॉकडाउनदरम्यान केला. ० तुमच्या रंगभूमीवरच्या प्रेमाविषयी सांगा...- नाटक हे माझ्या खूप जवळचं माध्यम आहे. गेली अनेक वर्षं मी व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकं करतेय. शेक्सपिअरच्या 'ट्वेल्फथ नाईट' या कथेवर आधारित 'पिया बेहेरूपिया' हे हिंदी नाटक आम्ही गेली दहा वर्षं जगभर, देशभर सादर करत आहोत. नाटक ही एक अतिशय जिवंत आणि चिरंतन अशी कला आहे. ० अभिनय क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नवोदितांसाठी काय सांगाल?- मनोरंजन क्षेत्रात ग्लॅमर आहे. तसंच भरपूर मेहनतही आहे. कधीकधी पहिल्याच प्रोजेक्टमध्ये खूप प्रसिद्धी मिळते. पण पुढे कामं मिळणं कठीण जातं. हे क्षेत्र खूप अनिश्चित आहे. इथे चिकाटी, मेहनत आणि संयमाला पर्याय नाही. अभिनयाचं रीतसर प्रशिक्षण स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मदत करेल. बदलत्या माध्यमांबरोबर सतत नवनवीन गोष्टी शिकत राहणं महत्त्वाचं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3o9f9kZ