मुंबई: गेल्या तीन महिन्यांपासून शांत असलेली गोरेगावची फिल्मसिटी आता पुन्हा एकदा गजबजणार आहे. गेल्या महिन्यात राज्य सरकारकडून चित्रीकरणासाठी हिरवा कंदील मिळाला तरी प्रशासकीय पातळीवर परवानगी मिळण्यात विलंब होत असल्याचा अनुभव निर्मात्यांना येत होता.आता परवानग्या मिळण्याच्या कामाला वेग आला असून, अनेक हिंदी-मराठी मालिकांना चित्रीकरणासाठी परवानगी मिळाली आहे. शूटिंगसाठी परवानगी मिळाल्यानंतर काही हिंदी मालिकांच्या चित्रीकरणास २२ जूनपासून सुरुवात होणार आहे. जुलै महिन्यापासून मालिकांचे नवे एपिसोड्स पुन्हा दिसणार आहेत. यामध्ये '' 'गुड्डन तुम से ना हो पाएगा', 'कुमकुम भाग्य', 'कुंडली भाग्य', 'तुझसे है राबता' यासारख्या मालिकांचे नवीन एपिसोड्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. एकता कपूरची 'कसौटी जिंदगी की-२' ही मालिका अनेक कारणांमुळं चर्चेच होती. आता या मालिकेचे देखील नवीन भाग प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहेत. एरिका फर्नांडिस या मालिके मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत असून तिनं शूटिंग तिनं या वातावरणात शूटिंग करण्यात नकार दिला होता. परंतु तिला सेटवर सर्व काळजी घेण्यात येईल, असं आश्वसन दिल्यानंतर ती शूटिंगला येण्यास तयार झाली. दरम्यान, मुंबई आणि राज्यांतील काही जिल्ह्यांत चित्रपट, टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही प्रकल्पांच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, सध्या त्याच्या पूर्वतयारीचं काम लगबगीनं सुरू आहे. या पूर्वतयारीत कलाकार आणि चित्रीकरणात सहभागी होणाऱ्या तंत्रज्ञ मंडळींना विमा संरक्षणाचं कवच देणं ही महत्त्वाची बाब आहे. परंतु विम्याचा हप्त्याचा भार कुणी उचलायचा, या मुख्य मुद्द्यावरुन काही ठिकाणी वाहिन्या आणि निर्माते यांच्यामध्ये अजूनही चर्चा सुरू आहे. परिणामी काही मालिकांतील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या विमा संरक्षणाचं घोडं अडलं आहे. गोरेगाव चित्रनगरीत, ठाणे ओवळे गाव आणि मीरारोड येथील काही स्टुडिओंमध्ये बाहुतांश हिंदी-मराठी टीव्ही मालिकांचं चित्रीकरण होतं. सध्या मालिकांना चित्रीकरणासाठी परवानगी मिळाली आहे. काही मालिकांनी एव्हाना चित्रीकरणाचा श्रीगणेशादेखील केला आहे. नव्या मार्गदर्शक नियमावलीनुसार सेटवर काम करणारे कलाकार, तंत्रज्ञ या सर्वांचा विमा उतरवणं बंधनकारक आहे. तशी रीतसर मागणीही 'सिने अँड टेलिव्हिजन आर्टिस्ट्स असोसिएशन' आणि 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एप्लॉइज' या संघटनांनी केली आहे. परंतु, सध्या मिळालेल्या माहितीनुसार ब्रॉडकास्टर (टीव्ही वाहिन्या) आणि मालिका निर्मात्यांमध्ये, विम्याच्या हप्त्याच्या रकमेचा भार कोणी आणि कसा उचलायचा यावरुन चर्चा सुरू आहे. विमा उतरवण्याची प्रक्रिया काहीशी किचकट आणि बजेट वाढवणारी असल्यामुळे निर्माते सध्या चिंतेत आहे. याबाबत निर्माते माहिती देण्यास तयार नाहीत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Nmc0el