मुंबई: बॉलिवूडमधील निर्माता, दिग्दर्शकांनाही ज्यांच्यापुढं नमून राहावं लागायचं, अनेक तारेतारकांना आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांच्या निधनानं बॉलिवूडमध्ये एक प्रकारची न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये त्यांना मानाचं स्थान होतं. त्यांचं आयुष्य देखील एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं होतं असलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्या निधनानंतर आता त्यांच्या आयुष्यावर बायोपिक येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर रेमो डीसूजा सरोज खान यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवार असल्याचं म्हटलं जात आहे. सरोज खान यांची लेक सुकैना नागपाल हिनं याबद्दल सांगितलं आहे. 'तीन निर्मात्यांनी आईच्या आयुष्यावर चित्रपट काढण्यासाठी तिची भेट घेतली होती. परंतु त्याचं काही पुढं झालं नाही.कुणाल कोहली, कोरियॉग्रफर आणि दिग्दर्शक बाबा यादव यांची पत्नीनं देखील आईचं आयुष्य मोठ्या पडद्यावर यावं यासाठी तिची भेट घेतली होती. तसंच रेमो डीसूजानंही आईच्या बायोपिकसंदर्भात बोलणी केली होती', असं तिनं म्हटलं आहे. 'तुझ्यावर बायोपिक येणार असेल तर तो कोण चांगल्याप्रकारे बनवू शकतो?,' असं सुकैनानं सरोज यांना याबद्दल विचारलं होतं. यावर सरोज यांनी रेमोच्या नावाला पसंती दर्शवली होती, असंही तिनं सांगितलं.'रेमोचं आयुष्य देखील माझ्यासारखंच आहे. त्यानं देखील शून्यातून विश्व निर्माण केलंय.आमच्या दोघांचं प्रोफेशनही एक आहे. तो माझी गोष्ट चांगल्याप्रकारे लोकांपर्यंत पोहोचवू शकतो' त्यामुळं त्यानंच माझ्या आयुष्यावर बायोपिक बनवावा', असं सरोज यांनी त्यांच्या मुलीला सांगितलं होतं. या संदर्भात रेमोनं देखील त्याची प्रतिक्रिया दिली आहे. ' सध्या तरी मी विषयावर काही बोलू इच्छीत नाही. लॉकडाउनपूर्वी सरोजजींसोबत मी त्यांच्या बायोपिक संदर्भात चर्चा केली होती. त्या माझ्या ऑफिसमध्ये आल्या होत्या',असं रेमोनं म्हटलं आहे. २२ नोव्हेंबर १९४८ रोजी सरोज खान यांचा जन्म झाला होता. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून त्यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्यांना लहानपणापासून नृत्याची आवड होती. विशेष म्हणजे त्यांनी नृत्याचं कोणतंही शिक्षण घेतलं नव्हतं. सरोज खान यांनी दोन हजारांहून अधिक गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन केलं होतं. त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास'मधील 'डोला रे डोला', माधुरी दीक्षितच्या 'तेजाब' सिनेमातील 'एक दो तीन' आणि २००७ मध्ये आलेल्या 'जब वी मेट' सिनेमातील 'ए इश्क हाए' या गाण्यांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसंच 'मैं नागिन तू सपेरा' आणि 'हवा हवाई' ही त्यांची गाणी प्रचंड गाजली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2OipJn7