Full Width(True/False)

या कलाकारांचा शूटिंगसाठी जीव झाला वेडापिसा

कोरोनाच्या संकटामुळे ठप्प असलेली टेलिव्हिजन इंडस्ट्री आता हळू हळू पूर्वपदावर येतेय. मालिकेमध्ये प्रमुख भूमिका मिळणं हे कुठल्याही नवोदित कलाकाराचं स्वप्न असतं. मालिकांत भूमिका साकारणाऱ्या काही कलाकारांचं हे स्वप्न पूर्णही झालं होतं. पण, करोनाचं संकट कोसळलं आणि चित्रीकरणाला खीळ बसली. आता हळूहळू मालिकांचं चित्रीकरण सुरू होतंय. 'या संकटकाळात मनात थोडी धास्ती असली, तरी शूटिंगसाठी जीव आतुर झाला आहे. त्याचा एक वेगळाच आनंद आहे', असं हे कलाकार म्हणताहेत. नक्की त्यांच्या मनात कोणत्या भावना आहेत आणि भविष्यात ते मालिकांचं चित्रीकरण कशापद्धतीने होईल याबद्दल बोलताना दिसत आहेत. मनात कुठेतरी धाकधूक आणि भीती असली तरी समोर आलेल्या आव्हानाला कलाकारांनी सामोरं जायचं ठरवलं आहे. शब्दांकन - गौरी भिडे

'जीव झाला येडापिसा' या मालिकेत आमचं लग्न होऊन आमची प्रेमकथा नुकतीच सुरू झाली होती. लोकांनाही ते बघायला आवडत होतं. पण, हे करोनाचं संकट आल्यामुळे कधीही न मिळालेला चक्क तीन महिन्यांचा ब्रेक मिळाला. लॉकडाउन सुरू असतानाच आमच्या मालिकेला एक वर्ष पूर्ण झालं. पहिले काही दिवस लॉकडाउनमध्ये काहीच कळत नव्हतं. पण, आता मी 'सिद्धी' या माझ्या पात्राकडे पुन्हा एकदा नव्यानं बघतेय. मी आत्मविश्वासानं पुन्हा चित्रीकरण सुरू करणार आहे. मालिकेतील सगळ्याच सदस्यांना आता एक कुटुंब म्हणून एकमेकांची काळजी घेत एकत्र राहायचंय. मनात भीती आहेच, पण काम सुरू होतंय ही गोष्ट सकारात्मक आहे.

लॉकडाउनमुळे कुटुंबासोबत वेळ घालवता आला. घरातल्या कामांमध्ये मदत करण्यातही मजा आहे हे मला या काळात लक्षात आलं. आमची 'राजा राणीची गं जोडी' ही मालिका सुरू होऊन काही महिने झाले होते. लॉकडाउनच्या काळात अनेक अनेक प्रेक्षकांचे मेसेज येतायत, की मालिका पुन्हा कधी सुरू होणार? अनेक जण रिपीट भाग बघतायत. माझी पहिलीच मुख्य भूमिका 'रणजित ढाले-पाटील' लोकांना प्रचंड आवडली आहे. या काळात मी स्वत: त्या भूमिकेचा अभ्यास केला. आता नव्या ऊर्जेनं आम्ही काम सुरू करणार आहोत. करोनाच्या काळात स्वत:ची काळजी घेत इतरांपासून शक्य तितकं लांब राहिलं तर भीती कमी होईल.

एक तर मुख्य भूमिका म्हणून पहिल्यांदाच माधवरावांसारखं पात्र करायला मिळाल्यावर आत्मविश्वासानं ते चांगल्या पद्धतीनं उभं करायचा प्रयत्न मी केला होता. ८ महिने जे काम केलं ते त्याचं विश्लेषण या लॉकडाउन काळात केलं. आता नव्यानं मालिका सुरू करताना अनेक बंधनं आहेतच आणि स्वातंत्र्य कमी आहे. ऐतिहासिक मालिकेच्या कथानकात तसंही फार क्वचित स्वातंत्र्य मिळतं. त्यामुळे याकडे मी पुन्हा एकदा संधी म्हणून बघतोय. मी जेव्हा या मालिकेसाठी पुण्याहून मुंबईला आलो तेव्हा माझ्या ओळखीचं कुणी नव्हंत. तेव्हा जो विश्वास मी ठेवला त्याच विश्वासानं आता एकत्र येऊन या संकटाला सामोरं जाऊ. चित्रीकरण सुरू झाल्यानंतर अनेक नियम जाचक वाटू शकतील. पण, कामाशी एकनिष्ठ राहून काळजी घेऊन काम सुरू होणं गरजेचं आहे.

आमची 'वैजू नंबर १' ही मालिका सुरू होऊन काही दिवसच झाले होते, तोच हे करोनाचं संकट येऊन उभं ठाकलं. तीन महिन्यांची ही सक्तीची सुट्टी त्रासदायक होती. कारण वैजूला मी खूप मिस करत होते. मी गावाला, कोल्हापूरला तीन महिने चांगल्या वातावरणात राहिल्यानं आता मुंबईला येणं धोक्याचं वाटतं. पण, चित्रीकरण सुरू होतंय याचं समाधान जास्त आहे. सगळी काळजी घेऊन मालिका सुरू झाल्यावर वैजू पुन्हा रसिकांचं मन जिंकेल असा विश्वास मला आहे. करोनामुळे असलेल्या सर्वत्र निराशेच्या काळात मालिकेच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन करता आलं तर आनंदच आहे.

तीन महिने चित्रीकरण बंद असल्यानं आता कधी एकदा शूटिंग सुरू होतंय असं मला झालं होतं. मी पुण्याहून मुंबईला गेल्यानंतर १४ दिवस क्वारंटाइन होतो. आता आम्ही मालिकेच्या सेटवरच सगळे एकत्र राहणार आहोत. जेणेकरुन कुणीही बाहेरची व्यक्ती आमच्या संपर्कात येणार नाही. सेटवरसुद्धा सगळी वैद्यकीय काळजी घेतली जातेय. 'माझा होशील ना' या आमच्या मालिकेत नुकतीच आमची प्रेमकथा सुरू झाली होती. त्यामुळे अनेक लोक उत्सुकतेनं वाट बघतायत की मालिका पुन्हा कधी सुरू होणार. सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करत आमचं चित्रीकरण पुन्हा सुरू झालय.

एका बड्या वाहिनीवर पहिलीच मालिका करायला मिळाल्यामुळे मी खूप खूश होते. मालिकेत समर आणि सुमीचं लग्न होऊन मिसेस मुख्यमंत्रीचा प्रवास आता कुठे सुरू झाला होता. लॉकडाउन इतकं वाढल्यावर आपली मालिका पुन्हा सुरू होणार की बंद पडणार अशी भीती मनात होती. पण, आता लवकरच चित्रीकरण पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे मी आनंदात आहे. अनेक रसिकांनी अॅपवर जुने भाग पाहिले. मालिका पुन्हा कधी सुरू होणार अशी वारंवार विचारणा होत होती. आता नव्या उमेदीनं लवकरच पुन्हा रसिकांच्या भेटीला आम्ही येतोय.

लॉकडाउनला सुरुवात झाली तेव्हा १५-२० दिवसांनी पुन्हा भेटू असं वाटलं होतं. परंतु ते नंतर तीन महिन्यांपर्यंत वाढलं. या दरम्यान अनेक रसिकांचे मेसेज आले की, मालिका पहिल्यापासून बघायला सुरुवात केलीय. तुझं 'उदय भालेराव' हे पात्र खूप आवडतंय. मालिका पुन्हा कधी सुरू होणार. तीच उत्सुकता आम्हालाही आहे. मी या लॉकडाउनच्या काळात आईबरोबर खूप वेळ एकत्र घालवला. आमच्या होणाऱ्या चर्चांमधून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आता जेव्हा मालिका पुन्हा सुरू होणार आहे तेव्हा मनावर थोडं दडपण आहे. पण आमची वाहिनी, निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक योग्य ती काळजी घेऊन काम करू असा विश्वास आहे.

पहिल्याच मालिकेत छत्रपती शिवरायांच्या मातोश्री असलेल्या जिजामातांसारखी भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्य आहे. लॉकडाउन जेव्हा वाढत होतं तेव्हा मालिका पुन्हा सुरू होणार की नाही अशी भीती मनात होती. पण, आता पुन्हा चित्रीकरण सुरू झालंय. पुन्हा काम करायला मिळतंय याचा आनंद वेगळाच आहे. आमची टीम आता अर्धी झाली आहे. ऐतिहासिक मालिका असल्यानं चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीची तयारी जास्त असते. पण, आमची टीम ते काम कौशल्यानं सांभाळत आहे. प्रत्येकाच्या मनात करोनाची धास्ती असल्यानं सेटवर अधिक सजगतेनं सगळ्यांचा वावर आहे. सरकारचे नियम पाळत, एकमेक‍ांची काळजी घेत चित्रीकरणाचा प्रारंभ झाला आहे.



from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38japzH