० अनलॉक ठरतोय नव्या मालिकांचा सीझन chaitali.joshi@timesgroup.com लॉकडाउनच्या काळात कधी नव्हे ती मालिकांना तीन महिने सुट्टी मिळाली. हळूहळू अनलॉक होत असताना काही नियमांच्या चौकटीत मालिकांच्या चित्रिकरणाला परवानगी मिळून शूटिंग सुरू झालं. त्यामुळे मालिकांचे नवे भाग प्रेक्षकांना पाहायला मिळू लागले. त्याबरोबरच आता नव्या मालिकांची नांदीही होताना दिसतेय. विविध विषय हाताळणाऱ्या अनेक नव्या मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत, तर काही लवकरच येत आहेत. अनलॉकचा हा काळ चॅनल्ससाठी नव्या मालिकांचा सीझन ठरू लागल्याचं दिसून येतंय. प्रत्येक चॅनल अधिकाधिक प्रेक्षकवर्ग खेचण्यासाठी आपापल्या नव्या मालिका घेऊन येत असल्यानं टीव्हीच्या पडद्यावर एक मालिकावॉर पाहायला मिळतंय. संध्याकाळचे सात वाजले, की बऱ्याच घरांमध्ये टीव्ही सुरू होतो. तेव्हापासून सुरू झालेला टीव्ही बंद होतो ते थेट रात्री साडेदहा-अकरा वाजता. मधल्या तीन महिन्यांत हा 'प्राइम टाइम' बंदच राहिला. लॉकडाउननंतर मालिकांचे नवे भाग पुन्हा प्रसारित करताना प्रेक्षकांना पुन्हा मालिकांकडे वळवणं, त्या-त्या मालिकांची लोकप्रियता टिकवून ठेवणं, सुरू असलेल्या कथानकात रंजकता आणणं अशी आव्हानं चॅनल्सपुढे होती. ती सांभाळत मराठी वाहिन्या आता नव्या मालिका सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मराठी चॅनल्सवर सध्या नव्या मालिकांची रांग लागली आहे. या निमित्तानं काही मालिकांमध्ये नवे चेहरे तर काहींमध्ये जुनेच, पण लोकप्रिय कलाकार पुन्हा एकदा मालिकांत दिसून येताहेत. '', 'सुख म्हणजे नक्की काय असतं', '', 'फुलाला सुगंध मातीचा', 'मुलगी झाली हो' या मालिका नुकत्याच सुरू झाल्या. तर 'सिंगिंग सुपरस्टार' हा रिअॅलिटी शोदेखील काही दिवसांपूर्वीच सुरू झाला. याशिवाय 'शुभमंगल ऑनलाइन', 'लाडाची मी लेक गं', 'आई माझी काळूबाई' या मालिका लवकरच सुरू होणार आहेत. कमी संचामध्ये शूटिंग, टीमची काळजी, सरकारी नियम ही आव्हानं असताना त्यात नव्या मालिकांचं आव्हानही चॅनल्सनी स्वीकारलं आहे. संपूर्ण लॉकडाउनमध्ये मालिकांचं फेरप्रक्षेपण दाखवण्यात आलं. तेच तेच भाग पाहून प्रेक्षकही कंटाळले. प्राइम टाइमला घराघरात सुरू राहणारा टीव्ही ऑफ मोडवर गेला. म्हणूनच अनलॉक होताना चॅनल्स प्रेक्षकांसाठी नवंकोरं भरपूर मनोरंजन घेऊन आली आहेत, असं काही तज्ज्ञ सांगतात. कमी संचामध्ये मालिकांचं शूटिंग करणं हे आव्हान नव्या मालिकांनादेखील पेलावं लागणार आहे. खरं तर नव्या मालिका सुरू होताना त्याची कथा प्रस्थापित होईस्तोवर त्यातली पात्रओळख होण्यासाठी सगळ्याच व्यक्तिरेखांना मालिकेत सुरुवातीला थोडा वेळ का होईना दाखवणं गरजेचं असतं. पण, आता कमी संचाच्या नव्या नियमाप्रमाणे मालिकेच्या सुरुवातीच्या मांडणीत काहीसे बदल करावे लागल्याचं समजतं. नवीन करमणूकलॉकडाउनमध्ये काही मालिकांचं फेरप्रक्षेपण करण्यात येऊन काही भाग दाखवले गेले. त्यामुळे आता अनलॉक होताना प्रेक्षकांना रिफ्रेश करण्यासाठी काहीतरी नवीन बघायला मिळावं यासाठी नवीन मालिकांचा विचार होतोय. मनोरंजन ही गरज असते. त्याचं साधनही घरातच असतं. त्यामुळे ते नव्या रुपात येणं महत्त्वाचं होतं. नवीन करमणूक म्हणून याकडे बघितलं जातंय. - सतीश राजवाडे, प्रोग्रामिंग हेड, स्टार प्रवाह प्राइम टाइम वाढवण्यासाठी प्राइम टाइमचा कालावधी वाढवण्याचा आमचा विचार लॉकडाऊनच्या आधीपासूनच होता. तसं कामसुद्धा सुरू झालं होतं. लॉकडाउनच्या काळातही त्याचं लिखाणं, कास्टिंग, प्लॅनिंग अशी कामं सुरूच होती. आता सर्व नियमांचं पालन करत जबाबदारीनं प्रत्यक्ष काम सुरू केलंय. दर्जात्मक कामामुळे मालिकांना योग्य तो प्रतिसाद मिळतो यावर आमचा विश्वास आहे. - दीपक राजाध्यक्ष, प्रमुख, मराठी टेलिव्हिजन, व्हायकॉम १८ नव्या मालिका कोणत्या? सुंदरा मनामध्ये भरली देवमाणूस सुख म्हणजे नक्की काय असतं? मुलगी झाली हो फुलाला सुगंध मातीचा शुभमंगल ऑनलाइन लाडाची मी लेक गं आई माझी काळूबाई


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hgO6h2