Full Width(True/False)

एखाद्या अभिनेत्याचा चित्रपट फ्लॉप झाला तर... तापसीनं सांगितलं बॉलिवूडचं कटू सत्य

मुंबई: अभिनेत्री तापसी पन्नूनं बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ती आपल्या प्रत्येक चित्रपटातून काही ना काही सामाजिक संदेश देताना दिसते. पण याच चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी मात्र बरीच मेहनत घ्यावी लागली होती. ज्याबाबत तापसीनं अनेकदा स्वतःची बाजू मांडली आहे. याशिवाय चित्रपटसृष्टीमध्ये होणाऱ्या भेदभावावरही तिनं अनेकदा भाष्य केलं आहे. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांसोबत हे घडतं. विशेषतः ज्यांच्याकडे अभिनयाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नाही त्यांना या ठिकाणी खूप संघर्ष करावा लागतो. त्यांच्याकडे अभिनयाचं उत्तम कौशल्य असतानाही त्यांना या ठिकाणी टिकून राहण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तापसी पुन्हा एकदा तिच्यासोबत झालेल्या भेदभावावर बोलली. या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना तिला काय काय अनुभव आले हे तिनं यावेळी शेअर केले. तापसी म्हणाली, ‘मी जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्यावेळी मला अनेक विचित्र गोष्टींचा सामना करावा लागला. बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींप्रमाणे मी सुंदर दिसत नव्हते. मला चित्रपटातून काढून टाकलं जायचं कारण एखाद्या अभिनेत्याच्या पत्नीला मी त्याच्यासोबत काम केलेलं नको होतं. एकदा एका चित्रपटाच्या डबिंगच्या वेळी मला असं सांगण्यात आलं की, अभिनेत्याला तुझा डायलॉग आवडला नाही त्यामुळे तो बदलावा लागेल. जेव्हा मी असं करण्यास नकार दिला त्यावेळी माझ्या मागे हे काम एका डबिंग आर्टिस्टकडून परस्पर करून घेण्यात आलं.’ तापसी पुढे सांगते, ‘एक वेळ तरी अशी सुद्धा आली होती की, मला सांगण्यात आलं अभिनेत्याचा मागचा चित्रपट फ्लॉप झाला आहे. त्यामुळे तू तुझं मानधन कमी कर ज्यामुळे बजेट कंट्रोलमध्ये राहिल. काही अभिनेते तर असेही होते ज्यांनी चित्रपटातील माझ्या इंट्रोडक्शनचे सीन बदलायला लावले होते. कारण त्यांना वाटायचं माझे इंट्रोडक्शन सीन त्यांच्या इंट्रोडक्शनवर भारी पडत आहेत. हे सर्व माझ्या समोर होत असे त्यामुळे मला माहित आहे. माझ्या मागे माहित नाही काय काय झालं असेल. त्यामुळे मग मी ठरवलं की, ज्या चित्रपटामध्ये काम करणं मला चांगलं वाटेल असेच चित्रपट मी साइन करेन.’ तापसीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती सध्या तिचा आगामी चित्रपट ‘रॉकेट रश्मी’च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. हा चित्रपट २०२१मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oAJRR2