गौरी भिडे राज्यात मालिकांच्या चित्रीकरणावर बंदी लागू केल्यानंतर मराठी मालिकांचे चित्रीकरण इतर राज्यांत सुरू करण्यात आले. 'राजा रानीची गं जोडी' आणि '' या दोन्ही लोकप्रिय मालिकांमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सध्या दीव आणि सिल्वासा अशा दोन्ही ठिकाणी चित्रीकरण करत आहेत. लॉकडाउनच्या आधी आठ तासांचा प्रवास करून शुभांगी गोखले दोन्ही ठिकाणचं चित्रीकरण करायच्या. त्यानंतर 'राजा रानीची गं जोडी' गोव्यात आणि 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेचं चित्रीकरण दमणला सुरू झालं. गोवा राज्यात करोनाची संख्या वाढल्यानं तेथील चित्रीकरण दीवला हलवण्यात आलं. 'येऊ कशी...'चे दमणला होत असलेलं चित्रीकरण काही कारणास्तव सिल्वासाला हलवण्यात आलं. आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर अहवाल येईपर्यंतचा वेळ आणि ४८ तासांच्या आत करावा लागणारा प्रवास यामुळे कलाकारांची सध्या धावपळ होतेय. घरी आल्यानंतरही क्वारंटाइन राहून स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी लागत आहे. याबद्दल शुभांगी यांनी सांगितलं की, 'दोन्ही सेटवर एवढी काळजी आणि सुरक्षितता आहे की काम करायला काहीच वाटत नाही. लोकांच्या मनोरंजनाबरोबर तंत्रज्ञ आणि इतरांचं काम सुरू राहतंय याचा आनंद आहे. मराठी मनोरंजनसृष्टीत कायमच खेळीमेळीचं वातावरण असतं. पण सध्या प्रवासाच्या दगदगीनंतर सेटवरील समजुतदारपणा आणि सामंजस्य पाहून आपलेपणा नक्कीच वाढतोय.' दोन्ही ठिकाणी दहा दिवसांचं चित्रीकरण पूर्ण करून, आरटीपीसीआर चाचणी करून, दोन मास्क, फेस शिल्ड यांसह शुभांगी विमानप्रवास करत आहे. तौक्ते वादळामुळे विमानसेवा बंद असल्यानं त्यांना चार दिवस दीवला जाता आलं नाही. त्यानंतर रात्रभर चित्रीकरण करून मालिकेच्या भागांची बँक तयार करण्यात आली. वाहिनी आणि मालिकेच्या टीमचे सहकार्य मिळत असल्यानं दोन्हीकडचं चित्रीकरण करता येत असल्याचं त्या आवर्जून सांगतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fqadnu