Full Width(True/False)

...आणि तो टर्निंग पॉइंट ठरला; अभिजीत गुरू सांगतोय त्याच्या लेखन प्रवासाबद्दल

माझं वय अकरा किंवा बारा वर्षं असेल. शाळेत मी लिहिलेल्या निबंधामधलं एक वाक्य मराठी शिकवणाऱ्या आमच्या शिक्षकांना खूप आवडलं आणि वर्गासमोर त्यांनी मला उभं राहून ते वाचायला लावलं. वर्गातल्या मुलांनी टाळ्या वाजवल्या. अर्थात वाक्यावर पडणाऱ्या टाळ्या आधी लेखकाच्या असतात नंतर अभिनेत्याच्या हे कळण्याचं ते वय नक्कीच नव्हतं आणि त्यात मला तर अभिनेताच व्हायचं होतं. पण प्रत्येक वेळी आपण ठरवतो तसं होतंच असं नाही. नदीच्या प्रवाहात पडलेल्या खडकानं स्फटीक व्हावं की पाषाणच रहावं हे ती नदी ठरवत असते, तो खडक नाही. आयुष्याचंही तसंच... नागपूरला असताना लहानपणापासून नाटक आणि सिनेमाची आवड होतीच. त्यात बालनाट्यात काम करायची संधी मिळाली. मग कीर्तनही करायला लागलो. रामायण, महाभारत, इसापनीतीपासून ते अरेबियन नाइट्सपर्यंत सगळ्या कथा लहानपणीच अगदी तोंडपाठ होत्या; पण अजूनही मला स्वतःला कधी काही लिहिता येऊ शकेल याची जाणीव नव्हती. पण कॉलेजमध्ये येताच तशी गरज मात्र निर्माण झाली. कारण तो काळ एकांकिका स्पर्धांचा काळ होता. नवीन एकांकिका असेल तर जास्त गुण मिळायचे. शिवाय मुंबई-पुण्याच्या प्रथितयश लेखकांनी लिहिलेल्या एकांकिकेची परवानगी मिळवता मिळवता पुरेवाट व्हायची. ‘बुराईने बंदूक चलाना सिखाँया, नेकी हल चलाना सिखाँ देगी’ शोले सिनेमात सलीम-जावेद यांनी दिलेला हा कानमंत्र घेतला आणि वयाच्या सतराव्या वर्षीच लेखक म्हणून लेखणी चालवायला शिकलो आणि शिकवणारे होते मी वाचलेलं साहित्य, बघितलेले चित्रपट आणि घेतलेला अनुभव. पहिली एकांकिका लिहिली आणि त्यात लेखनाचं बक्षीस मिळालं आणि अभिनेता म्हणूनही. अभिनयाबरोबर नाट्यलेखनाचा प्रवास सुरू झाला आणि बघता बघता सहा एकांकिका आणि तीन नाटकं लिहून झाली. आता मात्र मुंबई खुणावत होती. तिथे गेल्याशिवाय माझ्यातल्या कलागुणांना काही वाव नाही हे माहीत होतं. जाताना घरी सांगून आलो की, सहा महिन्यांत काम मिळालं नाही तर परत येईन. इथे आल्यावर कळलं की हे सगळं दिसतं तेवढं सोपं नाही. कॉलेजमध्ये केलेल्या एकांकिका, नाटकं याहीपेक्षा पलीकडे जाऊन इथे बरंच काही आहे. व्यावसायिक नाटक, सिनेमा आणि मालिकांचं तंत्र वेगळंच आहे जे शिकणं अपरिहार्य आहे. चाळीतली माळ्यावरची खोली, दहा रुपयाची राइस प्लेट, बसचं भाडं वाचवण्यासाठी तीन स्टॉप पायी चालत जाणं. हे सगळं करताना हळूहळू परिस्थिती मला अनुभवानं प्रगल्भ करत होती. कुठलंच काम मिळत नव्हतं म्हणून आधी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कामाला लागलो. चंद्रकांत कुलकर्णी, चित्रा पालेकर, कांचन नायक, विवेक देशपांडे, संतोष कोल्हे अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांकडे काम करायची संधी मिळाली. त्या अनुषंगाने चित्रपट तसंच मालिकेचं तंत्र शिकता आलं. पण हे सगळं करताना अभिनय आणि लेखन दोन्हीचा विसर मात्र पडला. मुंबईत स्थायिक होण्याच्या विवंचनेत तीन ते चार वर्षं दुसरं काहीच करता आलं नाही. पण पुढे माझ्या आयुष्यात एक वेगळंच वळण आलं, जिथून माझ्या लेखनप्रवासाला सुरूवात झाली. काही कारणास्तव मी मुंबईहून नागपूरला गेलो असताना एका नाटकवाल्या मित्राच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या शोकसभेत नागपूरचे बरेच नाट्यकर्मी भेटले. तिथे जे घडलं तोच माझ्या मेमरी कार्डचा टर्निंग पॉइंट ठरला. तिथे आलेल्या आमच्या नागपूरच्या एका ज्येष्ठ रंगकर्मींनी मला अचानकपणे प्रश्न केला, ‘काय रे लिखाण विसरलास का मुंबईला जाऊन?’ हा प्रश्न त्या ठिकाणी अनपेक्षितच होता. पुढे ते म्हणाले, ‘अरे बरा लिहायचास तू. लेखक कमी असतात रे... लिखाण सोडू नकोस.’ आणि त्यावेळी मला ते महोदय, ‘उड्डाणाचा विसर पडलेल्या मारुतीला उपदेश करणाऱ्या जांबुवंतासमानच वाटले.’ खरंच गेल्या चार वर्षांत मी एका शब्दाचं म्हणून लिखाण केलं नव्हतं. सहाय्यक दिग्दर्शनाचं काम तसंही त्यावेळी थांबलेलंच होतं. म्हणून मी स्वतःहून मालिका लेखन करणाऱ्या काही लेखकांना संपर्क करायला लागलो. सगळ्यात पहिला फोन मी चिन्मय मांडलेकर यांना केला. त्यावेळी ते तीन-चार मालिका लिहीत होते आणि त्यांना 'अवघाचि संसार' या मालिकेसाठी संवाद लेखक हवा होता. त्यांनी मला एक प्रसंग नीट समजावून सांगितला आणि तो लिहून दाखवण्यास सांगितला. मी तो त्यांना तिथेच लिहून दिला. त्यांनी तो वाचला आणि अगदी क्षणाचाही उशीर न करता माझ्यापुढ्यातच निर्मात्याला फोन करून सांगितलं की आपल्याला लेखक सापडलाय. तिथूनच माझ्या व्यावसायिक लेखनाला सुरूवात झाली. संवाद लेखनानंतर मी पटकथा लेखनाकडे वळलो आणि पुढे 'कशाला उद्याची बात', 'पुढचं पाऊल', 'देवयानी', 'लक्ष्य', 'झुंज', ''माझ्या नवऱ्याची बायको', 'तुला पाहते रे', 'ग्रहण', 'रंग माझा वेगळा', 'सुख म्हणजे नक्की काय असतं' अशा बऱ्याच मालिका लिहिण्याची संधी मिळाली. शिवाय काही सिनेमे आणि व्यावसायिक नाटकंही लिहिता आली. ज्याकडे दुर्लक्ष करत होतो त्याच माझ्या लेखन कलेने मला मुंबईत स्थायिक होऊन सन्मानानं जगण्यास मदत केली. आजही मी दोन मराठी आणि दोन हिंदी मालिकांचं लिखाण करतोय. सगळंच अनपेक्षित होतं. काहीच ठरवलेलं नव्हतं. पण खरंतर त्यातच मज्जा असते नाही? सरळसोट कथा रटाळच वाटते. एक मात्र नक्की, फक्त अभिनेता झालो असतो तर एका वेळी एकच पात्र रंगवता आलं असतं. पण लेखक म्हणून कोऱ्या पानावर एकाच वेळी अनेक पात्रांमध्ये मला हवे तसे रंग भरता येतात आणि हा आनंद निश्चितच वेगळा आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3Bwzu8e