Full Width(True/False)

अभिनेत्री स्पृहा जोशीनं शेअर केल्या 'बालश्री' पुरस्काराच्या आठवणी

-स्पृहा जोशी मी दादरच्या बालमोहन विद्यामंदिर शाळेची विद्यार्थिनी. मी नववीत असतानाची ही गोष्ट आहे. 'बालश्री' पुरस्कारासाठी शाळेतून विद्यार्थ्यांची नावं पाठवायची होती. 'बालश्री' हा राष्ट्रीय पुरस्कार नऊ ते सोळा या वयोगटातील कला-विज्ञान क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या मुलांना दिला जातो. परफॉरमिंग आर्टस्, फाईन आर्ट्स, क्रिएटिव्ह रायटिंग, क्रिएटिव्ह सायन्स असे या पुरस्काराचे चार विभाग होते. प्रत्येक विभागातून पाच मुलांना म्हणजे दरवर्षी एकूण वीस मुलांना हा पुरस्कार दिला जायचा. त्यावेळी मला वाटत होतं की आपण परफॉरमिंग आर्टस् या विभागामध्ये नाव देऊ या. पण आमच्या शाळेतल्या विद्याताई पटवर्धन यांनी मी क्रिएटिव्ह रायटिंग (सृजनशील लेखन) या विभागात उतरावं असा आग्रह धरला. 'बालश्री' पुरस्कारासाठीची पहिली फेरी मुंबई बालभवनला होती. स्टेपलरचं आत्मवृत्त, नऊ या आकड्याचं महत्त्व, ग्लोबल वॉर्मिंगबद्दल पृथ्वीचं म्हणणं असे विविध कल्पक विषय तिथे लेखनासाठी देण्यात आले होते. दिलेल्या शब्दांवरून कविता करा असा एक प्रकार होता आणि त्यावेळी मी माझी आयुष्यातली पहिली कविता तिथे केली होती. पुढची वेस्ट झोनची फेरी बडोद्याला होती. इथे वेगवेगळ्या राज्यातील मुलं आली होती. त्यामुळे प्रत्येकानं आपआपल्या मातृभाषेत लिहून काढलं तरीही संक्षिप्त रुपात हिंदी किंवा इंग्रजीमध्ये लिहायला सांगितलं होतं. माझं शिक्षणाचं माध्यम मराठी होतं. हिंदी-इंग्रजी या भाषांबाबत मी साशंक होते. तेव्हा मला अगदी तळ्यातून समुद्रात गेल्यासारखं वाटलं होतं. चुकलं तरीही चालेल; आपण प्रयत्न करू या. हा आत्मविश्वास पुढच्या वाटचालीत खूप उपयोगी ठरला. 'बालश्री' पुरस्काराची अंतिम फेरी दिल्लीच्या बालभवनात होती. भारताच्या वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या समवयस्क मुलांबरोबर चार दिवस राहायला मिळालं. तिथे 'सृजनात्मक लेखन' या विभागाबरोबरच आपण कसे राहतो, इतरांशी आपली वागणूक कशी आहे या गोष्टींचंही मूल्यमापन केलं जात होतं. २६ जानेवारीला जाहीर झालेल्या 'बालश्री' पुरस्कार विजेत्यांच्या यादीत माझंही नाव होतं. 'बालश्री' पुरस्कार सोहळा दिल्लीला राष्ट्रपती भवनात होता. माझ्याबरोबर माझे आई-बाबा आले होते. त्यावेळचा त्यांच्या डोळ्यातला अभिमान आजही मला स्पष्ट आठवतो. राष्ट्रपतींचे पाहुणे म्हणून आम्हाला तिथे विशेष वागणूक देण्यात आली होती. त्यावेळी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे राष्ट्रपती होते. राष्ट्रपतींसाठी आम्ही (सृजनात्मक लेखन विभागात पुरस्कार मिळालेल्या पाच जणांनी) आपापल्या मातृभाषेतून कवितेच्या ओळी लिहिल्या होत्या. ही कविता पुरस्कार सोहळ्यात सादर केली होती. डॉ. कलाम आमच्याशी खास संवाद साधत होते. तुमची स्वप्न काय आहेत? तुम्हाला काय आवडतं? तुम्ही काय वाचता? असे प्रश्न ते आम्हाला विचारत होते. तुमचं 'अग्निपंख' मी वाचलंय, असं मी त्यांना म्हणाले होते. आपण वाचलेल्या पुस्तकाचे लेखक, भारताचे राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ आपल्या समोर आहेत, आपल्याशी बोलत आहेत, हे सगळं मला स्वप्नवत वाटत होतं. 'बालश्री' पुरस्कारादरम्यान ओळख झालेल्या मित्रमैत्रिणींच्या मी अजूनही संपर्कात आहे. प्रत्येक जण आपआपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे. 'बालश्री' पुरस्काराच्या प्रवासानं 'आपण कोणीच नाही आहोत, पण तरीही आपण कोणीतरी आहोत' हे अगदी नकळत तारुण्यात मनावर कोरलं. हा संपूर्ण प्रवास ही माझ्यासाठी संपन्न अनुभवाची एक शिदोरी आहे. या प्रवासानं आयुष्याला एक समर्पक दिशा दिली. शब्दांकन : गौरी आंबेडकर, एसएनडीटी विद्यापीठ


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3H6wzG2