Full Width(True/False)

सुशांतसिंह राजपूतच्या आठवणीत रडल्या उषा नाडकर्णी

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या निधनाची बातमी जेव्हा सर्वत्र पसरली तेव्हा ज्येष्ठ अभिनेत्री यांना मोठा धक्का बसला. सुरुवातीला त्यांना या बातमीवर विश्वास बसला नाही. मात्र थोड्यावेळाने बातमी खरी असल्याचे कळताच त्यांचे हात-पाय थरथरू लागले. 'माझ्या हेअरड्रेसरने मला फोन करून सुशांतने आत्महत्या केल्याचं सांगितलं. मला सुरुवातीला खरं वाटलं नाही. मीच तिला ओरडले आणि म्हणाले असं काही बोलू नकोस.' यावर ती म्हणाली आई खरंय ते आपल्याच सुशांतसिंह राजपूतबद्दल बोलत आहेत. तिच्या वाक्यावर मला काय बोलावं सुचलंच नाही. मी थरथर कापू लागले. तो फार चांगला मुलगा होता. आम्ही जवळपास दोन ते अडीच वर्ष एकमेकांसोबत काम केलं.' ''पवित्र- रिश्ता'च्या सेटवर तो नेहमीच हसत खेळत रहायचा. पण तो लाजाळूही होता. सेटवर मीच जास्त मस्ती करायचे पण तो नेहमी मान ठेवून वागायचा. एका सीनमध्ये मी माझ्या ऑनस्क्रिन मुलीला सीन कसा करायचा ते सांगत होते तेव्हा तो स्वतः पुढे येऊन म्हणाला की, आई तुला काहीतरी शिकवत आहे. तिच्याकडून शिक. हे २०२० वर्ष फारच वाईट आहे. या वर्षात अनेक चांगले कलाकार आपल्याला सोडून गेले.' 'सेटवर सारेच मला आई हाक मारायचे. सुशांतही मला आईच बोलायचा. पवित्र रिश्ता शो सुरू झाला तेव्हा तो फक्त २३ वर्षांचा होता. आज जेव्हा मी त्याचे फोटो टीव्हीवर पाहते माझं काळीज तुटतं. सुशांतला जे हवं होतं ते त्याने स्वबळावर मिळवलं होतं. चांगले सिनेमे, घर सगळं त्याने कमावलं होतं. पवित्र रिश्ता मालिकेच्या वेळी त्याने सांगितलं होतं की लवकरच तो २ कोटींचं घर घेणार आहे. तसेच भविष्यात त्याला कोणती गाडी घ्यायची आहे याबद्दलही त्याने सांगितलं होतं.' 'सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर पोराला काय झालं काय माहीत. सिनेसृष्टीत ३६५ दिवस काम मिळत नाही. मी माझ्या मुलालाही तेच सांगते की काम मिळालं नाही म्हणून नैराश्यात जायचं नाही. जेवढं आपल्या नशिबात आहे तेवढंच आणि त्याचवेळी मिळतं. कोणतीही गोष्ट आधी किंवा नंतर मिळत नाही. त्यावेळी सुशांतसोबत घरातलं वडिलधारं कोणीतरी असायला हवं होतं. त्याचे बाबा किंवा बहिणींपैकी कोणीतरी त्याच्यासोबत राहायला हवं होतं.' उषा नाडकर्णी पुढे म्हणाल्या की, 'सुशांतला दिग्दर्शनातही रुची होती. दिग्दर्शनातले खाचखळगे शिकण्यासाठी त्याने पवित्र- रिश्ता मालिका सोडली होती. सुशांतला वाचनाची तुफान आवड होती. तेव्हा तो त्याचा सर्वाधिक पैसा पुस्तक विकत घेण्यावरच खर्च करायचा. सुशांतच्या वडिलांचं काय होत असेल याचा विचारही करवत नाही. वडिलांना मुलाचे अंत्यसंस्कार करावे लागतात याहून भयावह काहीच नसतं.' या गोष्टीची जाणीव होताच त्या रडू लागल्या.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3emBrsh