Full Width(True/False)

आम्ही आहोत म्हणून मालिकांना झणझणीत फोडणी मिळते

पूर्वी कुठल्याही मालिकेत सहसा एकापेक्षा जास्त खलनायकी व्यक्तिरेखा नसायच्या. मात्र, हा ट्रेंड आता बदलला आहे. एकापेक्षा जास्त खलनायकी व्यक्तिरेखा नायक, नायिका किंवा त्यांच्या कुटुंबाला त्रास देताना दिसताहेत. काही खलनायक कुटुंबातच आहेत. 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतली इशा केसकर, किशोरी आंबिये आणि त्यांच्याबरोबर अभिजित गुरु देखील कधी-कधी संधीसाधू खलनायक बनतो. तर 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेत वंदना गुप्ते, शर्मिष्ठा राऊत, विदीशा म्हसकर, अश्विनी मुकादम या सगळ्या जणी मृणाल दुसानिसला त्रास देण्यासाठी टपून बसलेल्या असतात. दुष्टपणे वागणारे, कपट-कारस्थानं करणारे खलनायक-खलनायिका जर मालिकांमध्ये नसतील, तर त्या अळणी वाटणार नाही का? त्यामुळे आमचा प्रचंड राग आला, तरी आम्ही आहोत म्हणून मालिकांना झणझणीत फोडणी मिळते...हे म्हणणं आहे टीव्हीवर व्हिलन साकारणाऱ्या कलाकार मंडळींचं. भूमिका रंगवण्यासाठी करत असलेले प्रयत्न, त्यांना येणारे कधी गमतीदार तर कधी नकोसे अनुभवही या खलनायक मंडळींनी सांगितले आहेत.

'राजा राणीची गं जोडी' या आमच्या मालिकेची मूळ कथा अनेक वळणं घेत पुढे सरकतेय. अठरा वर्षांखालील मुलीचा एका खानदानी पोलीस अधिकाऱ्याशी होणारा विवाह या संकल्पनेत सगळी गंमत दडली आहे. लॉकडाउननंतर नव्यानं सुरुवात करताना पुन्हा एकदा प्रत्येक पात्राची गुणवैशिष्ट्यं अधोरेखित करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. राजश्री हे माझं पात्र येत्या काळात अधिक उठावदार होणार आहे. संजीवनीला त्रास देण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या राजश्री शोधून काढणार आहे. मधल्या काळात मालिकेचं फेरप्रक्षेपण प्रेक्षक पाहत होते. समाज माध्यमांद्वारे प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया मला मिळाल्या आहेत. 'तुमचा खूप राग येतो', 'कृपया आमच्या लाडक्या संजूला छळू नका' हे वाचताना मजा वाटते. एकदा आमच्या सांगलीच्या सेटवर अशीच एक गंमत झाली होती. मार्च महिन्यात काही प्रेक्षक शूटिंग बघायला म्हणून आले. रणजित, संजीवनी, आईसाहेब या सगळ्यांबरोबर मस्त सेल्फी काढणं चाललं होतं. छान गप्पा रंगल्या होत्या. पण, माझ्याशी बोलायला येताना, सेल्फीसाठी विचारताना अनेक प्रेक्षक खूप घाबरत होते. मी पटकन त्यांच्या अंगावर ओरडेन की काय अशी भीती त्यांना वाटत होती. मी हसून स्वागत केल्यावर त्यांची भीती कुठल्याकुठे पळून गेली.

- श्रुती अत्रे (राजश्री - राजा राणीची गं जोडी)

'रात्रीस खेळ चाले'मधल्या अण्णांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. आम्ही आता मालिकेच्या शेवटाकडे चाललो आहोत. नियोजित आखणीप्रमाणेच आमची मालिका पुढे चालली आहे. प्रेक्षकांना अण्णांचा राग येतो याचा मला आनंद आहे. 'तुम्हाला मारावंसं वाटतं' असे अनेक महिलांचे मला मेसेजेस येतात. पण, एखाद्या भागात तुम्ही दिसला नाहीत, तर करमत नाही, असंही लोकं सांगतात. अण्णा येऊन काय करामत करणार याची त्यांना उत्सुकता असते. सध्या प्रेक्षकांना शूटिंग बघायला येता येत नाहीय. त्यामुळे इतका शांत असलेला सेट पाहून मलाच चुकल्याचुकल्यासारखं होतंय. पूर्वी सेटवर जत्रा फुललेली असायची. एकदा एक शीख मनुष्य भेटायला आला होता. त्यानं चक्क मालवणीत माझ्याशी संवाद साधला. इतर भाषक मंडळीसुद्धा या मालिकेवर तेवढंच प्रेम करतायत हे पाहून आनंद होतोय.

- माधव अभ्यंकर, (अण्णा - रात्रीस खेळ चाले २)

प्रज्ञा साकारताना मी जीन्स-टॉप घालते. एरवीसुद्धा मी साधारणपणे ती त्याच वेशभूषेत असते. त्यामुळे लोकं मला अगदी पटकन ओळखतात. कुठेही दिसले तरी स्मितहास्य करून हाय, हॅलो करतात. हल्ली तर मी मास्क लावलेला असतो. तरीही अनेक जण ओळखतात आणि हात करतात. याचं मला फार आश्चर्य वाटतं. एकदा अंधेरी मार्केटमध्ये एका फुलवाल्या आजींकडून मी हार घेत होते. मी त्यांना पैसे द्यायला गेले, तर त्या गोड हसल्या आणि म्हणाल्या, 'दोन हार फुकट देते तुला. पण, आमच्या आसावरीचा नाद सोड.' प्रेक्षकच आमच्या भूमिकेला अधिक रंग देतात असं मला वाटतं. प्रज्ञाला इतरांमध्ये भांडणं लावून देण्यात आनंद मिळतो. स्वतःच लावलेल्या भांडणाची ती पूरेपूर मजा घेते. प्रज्ञा हे अतर्क्य पातळीवरचं पात्र असलं, तरी मालिकेतलं नाट्य तिच्यामुळे अधिक रंजक होतंय. अशा छोट्या-मोठ्या प्रज्ञा आपल्याही आजूबाजूला असतात. त्यामुळे प्रज्ञाची चीड येत असली, तरीही ती हवीहवीशी वाटते.

-संजीवनी साठे,( प्रज्ञा - अगं बाई सासूबाई)

सध्या एकीकडे मी शनायाची मॉडर्न मम्मा साकारते आहे. तर दुसरीकडे 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेत गावंढळ ढवळे मामी म्हणून दिसतेय. 'ढवळून टाकीन' असं म्हणणारी ही ढवळे मामी फक्त स्वतःचा विचार करणारी आहे. तिचा अहंकार दुखावला गेला आहे. त्यामुळे आता अधिक चवताळून ती तिचा राग व्यक्त करणार आहे. एका कुटुंबाशी तिचं वैर आहे आणि त्यांना धडा शिकवायला ती कुठल्या थराला जाते, हे पाहण्यात गंमत आहे. आतापर्यंत एक अभिनेत्री म्हणून मालिकेत मी वेगवेगळ्या प्रकारच्या खलनायिका साकारल्या आहेत. प्रेक्षकांनी त्यांच्या झणझणीत प्रतिक्रिया नोंदवून नेहमीच माझ्यावर भरभरून प्रेम केलं आहे. पण, खलनायिका कितीही रंगवलेली असली, तरीही तिची प्रवृत्ती थोड्या-फार फरकाने आपण वास्तवातही अनुभवत असतो. त्यामुळे तिचा प्रचंड राग येणं अगदी स्वाभाविक आहे. एकदा मी नरसोबाच्या वाडीला देवदर्शनासाठी गेले होते. तेव्हा काही ढालगज महिलांनी मला घेरलं. 'तुझ्या पापांचा घडा अजून भरला नाही ? इतकी पापं करून वर देवदर्शनाला येतेय ? देव तुला माफ करणार नाही,' असा दम भरला होता. त्यावेळी मी खूप घाबरले होते. प्रेक्षक आपल्या मालिकेत किती गुंतलेले असतात याची प्रचिती या निमित्तानं येते.

- किशोरी आंबिये (ढवळे मामी - सहकुटुंब सहपरिवार आणि शनयाची मम्मा - माझ्या नवऱ्याची बायको)

आमची ऐतिहासिक मालिका असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रासंगिक बदल आम्ही करू शकत नाही. ज्योतिरावांचा छळ करणारं, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असलेलं केशव भट हे पात्र मी रंगवतो आहे. केशव भट या पात्राला कंपवात आहे. त्यामुळे त्याची विचित्र लकब सतत लक्ष वेधून घेते. केशव भट ही समाजातली एक प्रातिनिधिक प्रवृत्ती आहे. या भूमिकेसाठी पडद्यामागे अपर्णा पाडगावकर, उमेश नामजोशी, नितीन वैद्य, निनाद वैद्य यांनी खूप सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण मांडणीमुळे मी केशव भट अधिक ताकदीनं साकारू शकतोय. सध्याची परिस्थिती या खलनायकासाठी निश्चितच आव्हानात्मक आहे असं मला वाटतंय. कारण दरारा, दहशत तर निर्माण करायची आहे. पण, सहकलाकाराच्या जवळ जाण्यावर बंधनं आहेत. आधी पटकन कॉलर पकडली किंवा अगदी जवळ जाऊन डोळ्यांत डोळे घातले, की उचित परिणाम साधता यायचा. पण सध्या आवाजातील चढ-उतार आणि देहबोलीवर अधिक काम करावं लागतंय. 'त्या केशव भटाला धरून मारला पाहिजे' असं जेव्हा लोकं म्हणतात, तेव्हा माझ्या कामाची पावती मला मिळते.

- मनोज कोल्हटकर (केशव भट, सवित्रीजोती)

आनंदीबाई हे माझं मालिकेमधलं पहिलं काम आहे. सुरुवातीला ग्रे शेडची असणारी ही भूमिका हळूहळू आपला डाव साधत जाते. माझा स्वभाव आनंदीबाई या पात्राच्या अगदी विरुद्ध आहे. त्यामुळे भूमिकेत शिरायला, मुरायला मला थोडा वेळ लागला. माझ्यातल्या अभिनेत्रीचा कस इथे लागतो आहे. गेल्या तीन महिन्यांत मी आनंदीबाईंबद्दल भरपूर वाचन केलं आणि त्या मला सापडत गेल्या. आनंदीबाई अगदी गोड हसून स्वतःचा डाव साधतात. अतिशय बुद्धिमान स्त्री म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. त्यांना राजकारण कळायचं आणि खेळताही यायचं. त्यामुळे प्रेक्षक जेव्हा मला सांगतात की 'आनंदीबाई खूप सुंदर दिसतात. पण, डोकं लढवून त्या स्वतःला हवं ते बरोबर घडवून आणतात' तेव्हा माझं काम लोकांपर्यंत पोहोचतंय असं वाटतं. आत्मविश्वास वाढतो आणि काम करायला उभारी येते.

- कुंजिका काळविंट, (आनंदीबाई, स्वामिनी)

'रंग माझा वेगळा' या मालिकेत श्वेता हे पात्र मी साकारत आहे. मालिकेत आता कार्तिक आणि दीपाचं लग्न झाल्यामुळे, श्वेताला जबरदस्त धक्का बसला आहे. श्वेताची चूक नसताना ती तोंडघशी पडली आहे. त्यामुळे आता ती बदला घेणार हे निश्चित. सौंदर्या इनामदार श्वेताला एकटीला टाकून नामानिराळी झाली आहे. म्हणून आता आरडाओरडा, चिडचिड अजिबात करायची नाही. तर शांत राहून, डोकं चालवून आपल्याला हवं ते मिळवायचं असं तिनं ठरवलं आहे. तिचा राग ती वेगळ्या पद्धतीनं व्यक्त करणार आहे. 'तुझा खूप राग येतो' असं म्हणून अनेक मंडळी माझं कौतुक करतात. पण, काही जवळच्या माणसांनी माझ्यावर धरलेला राग मला महागात पडतोय. मालिका सुरू झाल्यापासून माझे आजोबा मला सांगतायत, 'अगं, नको त्या दीपाच्या मागे लागूस.' हा राग त्यांनी इतका मनात धरला आहे की श्वेता म्हणून माझ्याशी बोलतानाही ते रागावलेले असतात. माझ्या घराजवळ नाशिकला, माझा दोन वर्षांचा एक छोटा मित्र आहे. तो माझी मालिका आवडीनं बघतो. पण, आता तो माझ्याशी पूर्वीसारखा मस्ती करत नाही. 'मी तुझ्याशी कट्टी आहे. दीपाशी बोलायचं मला' असा त्याचा हट्ट असतो.

-अनघा अतुल (श्वेता - रंग माझा वेगळा)

साडेतीन महिन्यांनी आम्ही पुन्हा सुरुवात करत आहोत. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी गोष्टीत अनेक ट्विस्टस आणले जात आहेत. पण, काकू या माझ्या व्यक्तिरेखेकडून होणारी कारस्थानं अनेक पटींनी वाढणार आहेत, असं म्हणायला हरकत नाहीत. नायक-खलनायिकेतलं नाट्य तुमची उत्सुकता शिगेला पोहोचवणार आहे. या काका-काकूंना काहीही करून पैसा, कंपनी, संपत्ती बळकवायची आहे. त्यांचे मनसुबे पूर्ण करण्यासाठी आता तयारीनिशी ते मैदानात उतरले आहेत. माझी खलनायिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मी जेव्हा घरातल्या कार्यक्रमांना, कौटुंबिक समारंभांना जाते तेव्हा अनोळखी बायकासुद्धा आवर्जून येऊन भेटतात. 'काकू म्हणून तुम्ही खरं तर आम्हाला त्रासदायक वाटता. पण, तुमच्या भूमिकेचं कौतुक करावंसं वाटतं.' प्रेक्षकांची ही दाद ताकदीनं काम करायला बळ देते. या निमित्तानं 'कृपया माझा राग करा' अशी प्रेमळ विनंती मला त्यांना करायची आहे.

- अश्विनी मुकादम,(काकू -सुखाच्या सरींनी हे मन बावरे)



from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39GAwBb