मुंबई: गेल्या दोन दिवसापासून जोरदार कोसळणाऱ्या पावसानं मुंबईला अक्षरश: झोडपून काढलं. भर पावसात ‘चला हवा येऊ द्या’ फेम प्रसिद्ध अभिनेते यांना धक्कादायक प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. पावसामुळं रस्त्यांवर प्रचंड ट्रॅफिक होतं. या परिस्थितीचा फायदा काही चोरट्यांनी घेतला आणि गणेशपुरे यांचा मोबाईल फोन लंपास केला. हा सर्व प्रसंग त्यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. फेसबुक लाइव्ह करत भारत गणेशपुरे यांनी त्याच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला आहे.'आज माझा मोबाईल अक्षरशः लुटून नेला आहे. ही घटना घडली ती कांदिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या फ्लाय ओव्हरवर .काल दरड कोसळल्यामुळं तिथं खूप पाऊस होता, खूप ट्रॅफिक होतं. त्यावेळी दोन माणसं आली आणि त्यांनी खूप विचित्र पद्धतीनं माझी गाडी ठोठावली, मात्र तरीही मी काच उघडली नाही. मात्र, माझ्या दुसऱ्या बाजूला असलेल्या माणसानं कारचा दरवाजा उघडला. त्याक्षणी त्या व्यक्तीनं ओकारी काढण्याचं नाटक केलं. त्याचवेळी माझ्या बाजूनं एक माणूस आला आणि काच वाजवली. मी त्याच्याकडं पाहिलं, तर तितक्यात ओकारी काढणाऱ्या माणसानं माझा मोबाईल चोरुन नेला', असा हा थरारक अनुभव गणेशपुरेंनी शेअर केला आहे. हा अनुभव शेअर केल्यानंतर भारत गणेशपुरे यांनी नागरिकांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. 'आज माझ्यासोबत ही घटना घडली आहे. मात्र, तुम्ही सतर्क राहा. सध्या कोरोनामुळं स्थिती वाईट आहे. या परिस्थितीमुळं खूप गोष्टी घडत आहेत. तुमच्यासोबत देखील अशाच पद्धतीची घटना घडली तर आधी तुमची गाडी बंद (लॉक) करा. काच उघडू नका. तुम्हाला कुणी निर्दयी म्हटलं तरी चालतंय. दिवस वाईट आहेत. या प्रकारात बायका, मुलं, लहान मुलं अशी टोळी असते, असं गणेशपुरे यांनी त्यांच्या फेसबुक लाइव्हमध्ये म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2DMjfdO