Full Width(True/False)

बघवत नाही ते; 'त्या' मराठी मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले

मुंबई: एक तरुण डॉक्टर आणि त्याच्याबरोबर एक स्त्री बाकावर बसलेली आहे. त्या स्त्रीनं डॉक्टरच्या खांद्यावर विश्वासानं मान ठेवली आहे. ती घाबरुन त्याला काहीतरी सांगू पाहते. तो तिला कुठेतरी घेऊन जातो, झोपवतो. 'तुझा माझ्यावर विश्वास आहे ना?' असं विचारत तिला डोळे बंद करायला सांगतो. त्यानंतर चाकू काढून तो सर्रकन फिरवतो. रक्ताची चिळकांडी उडते आणि त्या स्त्रीचे हलणारे पाय हळूहळू शांत होतात…. एका वाहिनीवर सुरू होणाऱ्या नव्या मालिकेचा हा ट्रेलर सध्या चर्चेत आहे. ट्रेलर पाहताना अंगावर शहारे येतात. त्यात दिसणारं रक्त, डॉक्टरनं तिचा गळा कापल्याचं दृश्य सहकुटुंब टीव्ही पाहताना बघवत नसल्याचा सूर प्रेक्षकांमधून उमटू लागला आहे. अतिशय अंगावर येणारा हा टिझर सध्या चर्चेचा विषय ठरला असून त्यावरुन नापसंती व्यक्त होतेय. भोळेपणाचा आव आणत एका गावात आलेल्या एका बोगस डॉक्टरनं केलेली लोकांची फसवणूक या आगामी मालिकेतून पाहायला मिळणार असल्याचं कळतंय. मालिकेबाबत उत्सुकता निर्माण करण्याचं काम टिझरनं पार पाडलं आहे. पण,'किती भयंकर दाखवतात हे' अशी प्रेक्षकांची पहिली प्रतिक्रिया आहे. यापूर्वीही असे काही टिझर्स चर्चेत राहिले होते. काही महिन्यांपर्वी आलेली 'रुद्रम' ही मालिका. मुक्ता बर्वेचा अतिशय घाबरलेल्या अवस्थेत काहीतरी सांगू पाहणारा तो टिझर तेव्हा अंगावर आला होता. 'गर्ल्स हॉस्टेल' मालिकेचा घाबरवणारा टिझर अलीकडेच येऊन गेला. सुरुची आडारकर 'एक घर मंतरलेलं' या मालिकेत, ती टीव्हीमध्ये चाचपडताना पाहून प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. तर 'रात्रीस खेळ चाले'चा पहिला सीझन जेव्हा येणार होता, तेव्हाच्या टिझरमधील 'आमच्याकडे कोंबड्या नाय' हे वाक्य, अण्णांचा हलता झोपाळा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हे होते प्रेक्षकांना घाबरवून सोडणारे टिझर. मुळात कुठल्याही टिझर्सचं मुख्य कामच हे असतं की प्रेक्षकांमध्ये आगामी मालिकेविषयी उत्सुकता निर्माण करणं. त्यासाठी वेळप्रसंगी अतिरंजितपणाचाही आधार घेतला जातो. असे अनेक टिझर्स चर्चेत राहतात. पण, टीव्ही माध्यम सहकुटुंब पाहिलं जात असल्यानं त्याचं भान राखलं जायला हवं, असा सूर उमटताना दिसतोय. आपली मालिका किंवा आगामी शो आधीपासूनच चर्चेत आणण्यासाठीही कसे पद्धतशीरपणे प्रयत्न केले जातात हेही नुकतंच समोर आलं ते 'बिग बॉस'च्या निमित्तानं. त्याला निमित्त ठरले जवळपास महिन्याभरापूर्वी सलमान खानचे भातलावणी करतानाचे व्हायरल झालेले फोटो. सलमानला 'मेरे देश की धरती…...'च्या तालावर शेतात मेहनत करताना पाहून त्याचे चाहते मनोमन सुखावले होते. लॉकडाउनच्या काळात भाईजान त्याच्या पनवेलमधील फार्महाऊसवर राहिला असल्याचं कळलं होतंच. नंतर शेतात घाम गाळतानाचा त्याचा व्हिडीओही समोर आला. लॉकडाउनच्या काळात आपल्या लाडक्या स्टारचे पाय 'जमिनीवर' असल्याचं चाहत्यांनी पाहिलं. पण, तेव्हा हे कुठलं तरी प्रमोशन असेल, अशी पुसटशी शंकाही कुणाच्या मनात आली नव्हती. (अर्थात, चाणाक्ष प्रेक्षकांना 'दाल में कुछ काला है' अशी शंका आली होतीच म्हणा) पण, नंतर 'बिग बॉस'च्या आगामी सीझनची चर्चा होऊ लागली. सलमानच तो होस्ट करणार असल्याचं समजलं. साडेतीन महिन्यांच्या ब्रेकनंतर शूटिंग पुन्हा सुरू होत होतं. कठीण काळातून न्यू नॉर्मलकडे येणारी ही थीम आहे. त्यामुळे सल्लूमियाँनी 'बिग बॉस'साठी शेतात उतरुन भातलावणीचा हा घाट घातल्याचं अखेर लक्षात आलं. प्रेक्षकांची ट्यूब पेटली, पण तोवर टिझरनं नेहमीप्रमाणे त्याचं काम चोख केलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/325bRTA