Full Width(True/False)

सुशांतच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी, जाणून घ्या गेल्या दोन महिन्यात काय झालं

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. आता सीबीआय या प्रकरणाची चौकशी करेल असं या निर्णयात स्पष्ट करण्यात आलं. तसेच मुंबई पोलिसांना सीबीआयची मदत करण्याचेही आदेश यावेळी देण्यात आले. न्यायलयाने आपला निकाल सांगताना स्पष्ट केलं की, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कोणताही तपास केला नाही फक्त चौकशी केली. आता या प्रकरणाशी निगडीत सर्व तपास सीबीआयच करेल. सुशांतच्या मृत्यूच्या दिवसापासून त्याचे कुटुंबिय आणि चाहते या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी याची मागणी करत होते. न्यायालयानेही आता सर्व कागदपत्रं सीबीआयकडे सोपविण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. सुशांतच्या मृत्यूच्या दोन महिन्यांनंतर आता सीबीआय या प्रकरणाची नव्याने चौकशी करेल. दरम्यान या दोन महिन्यांत कोणत्या घडामोडी घडल्या त्या जाणून घेऊ.

१४ जून रोजी सुशांतसिंह राजपूतचा मृतदेह त्याच्या राहत्या घर मिळाला. त्याच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या घराणेशाही आणि गटबाजीची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. १५ जून रोजी कंगना रणौतने स्वतःचा व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, सुशांतची आत्महत्या नसून कोणीतरी पूर्ण योजनेने त्याची हत्या केली आहे. सुशांतच्या निधनानंतर करण जोहर, एकता कपूर, आलिया भट्ट, सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर यांच्यासह अनेक स्टार्सना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. सिनेसृष्टीत स्टार किड्स आणि आउट सायडर असे दोन गट पडले.

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी बिहारच्या एका वकिलाने स्थानिक न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता. या प्रकरणात एकता कपूर व्यतिरिक्त करण जोहर, संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांच्यासह आठ जणांविरूद्ध बिहारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. वकील सुधीर ओझा यांनी या सर्व कलाकारांविरोधात मुजफ्फरपूर न्यायालयात आयपीसीच्या कलम ३०६, १०९, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. १४ आणि १५ जून दरम्यान पोलिसांनी सुशांतच्या जवळच्या नऊ जणांचा जबाब नोंदवून घेतला. यामध्ये सिद्धार्थ पीठानी (क्रिएटिव्ह कन्टेट मॅनेजर), दिपेश सावंत (घरकाम करणारा), स्वयंपाकी, मित्र महेश शेट्टी, खोली उघडण्यासाठी बोलावलेला चावीवाला, वडील केके सिंह आणि सुशांतच्या घरात राहणाऱ्या तीन बहिणींचा जबाब नोंदवून घेण्यात आला.

१८ जून रोजी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीचा जबाब नोंदवण्यासाठी वांद्रे पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं. पोलिसांनी रियाची सुमारे नऊ तास चौकशी केली आणि जबाब नोंदवून घेतला. यावेळी रियाने सुशांतची आणि तिची भेट २०१२ मध्ये यशराजच्या 'मेरे पिता की मारुती' सिनेमात काम करताना झाली होती. तेव्हा सुशांत यशराज फिल्म्सच्या बॅनरचा 'शुद्ध देसी रोमांस' सिनेमाचं शूटिंग करत होता. यााशिवाय दोघंही अनेकदा पार्ट्यांमध्ये भेटले आणि पटकन मित्र झाले. थोड्या काळातच दोघं एकमेकांना डेट करू लागली होती. १८ जून रोजी यशराज फिल्म्सने सुशांतसोबत केलेल्या कराराची प्रत पोलिसांना दिली होती. यशराजने सुशांतबरोबर तीन चित्रपटांचा करार केला. त्या तीन चित्रपटांपैकी सुशांतने यशराजसोबत 'व्योमकेश बक्षी' आणि 'शुद्ध देसी रोमांस' मध्ये काम केले होते. त्याचबरोबर 'पानी' हा तिसरा चित्रपट बजेटमुळे सुरू करण्यात आला नव्हता. हा चित्रपट होत नसल्यामुळे सुशांत खूप नाराज झाला होता.

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी बिहार जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवानने चौकशीची मागणी केली होती. २२ जूनला चिराग पासवान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. पासवान यांना प्रतिक्रिया देताना ठाकरे यांनी पोलीस प्रकरणाची चौकशी करत असल्याचं सांगितलं. जर कोणी या प्रकरणात दोषी मिळाला तर त्याच्यावर कारवाई होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. २४ जूनला सुशांतचा अखेरचा शवविच्छेदनाचा रिपोर्ट समोर आला. सुशांतच्या निधनानंतर कूपर इस्पितळाने हा रिपोर्ट दिला. रिपोर्टमध्ये सुशांतचा मृत्यू Asphyxia मुळे झाल्याचे स्पष्ट केले. याचा अर्थ शरीराला आवश्यक असा ऑक्सीजनचा पुरवठा न मिळणे.

२७ जून रोजी यशराज फिल्म्सची कास्टिंग डायरेक्टर शानू शर्माचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. शानूची काय चौकशी केली गेली याबद्दल फारसं कळलं नाही. मात्र यशराज फिल्म्समध्ये सिनेमांमध्ये कशाप्रकारे कास्टिंग केलं जातं याची प्रक्रिया पोलिसांनी समजून घेतली. १ जुलैला सुशांतचा विसरा रिपोर्ट आला. यात सुशांतच्या शरीरात कोणत्याही प्रकारचा विषारी पदार्थ मिळाला नसल्याचं स्पष्ट झालं. शवविच्छेदनाच्या अंतिम रिपोर्टनंतर विसराला जेजे इस्पितळात विश्लेषणसाठी पाठवण्यात आलं होतं.

६ जुलै रोजी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा जबाब नोंदविण्यात आला. संजय लीला भन्साळी यांनी सुशांतला कोणत्याही सिनेमातून बाहेर काढले नसल्याचं स्पष्ट केलं. यासोबतच गेल्या चार वर्षात दोघं भेटलेही नसल्याचं त्यांनी सांगितलं. भन्साळी यांनी पोलिसांना सांगितले की जेव्हा त्यांनी सुशांतला चित्रपट ऑफर केले तेव्हा तो 'पानी' चित्रपटामध्ये व्यग्र होता. भन्साळी व्यतिरिक्त दिग्दर्शक शेखर कपूर यांनी ईमेलद्वारे आपला जबाब पोलिसांना पाठवला. याशिवाय धर्मा प्रॉडक्शनच्या सीईओनेही पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला.

सुशांतचे वडील केके सिंह यांनी रिया चक्रवर्ती विरूद्ध एफआयआर नोंदवून संपूर्ण प्रकरण फिरवले. केके सिंह यांनी रियावर १५ कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप केला. तसेच इतर अनेक गंभीर आरोपही केले. पाटणा येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर बिहार आणि मुंबई पोलिसांमधील संघर्ष चव्हाट्यावर आला. दरम्यान, बिहार सरकारने सीबीआय चौकशीची मागणी मान्य केली आणि यासंदर्भात शिफारस केली. रिया चक्रवर्तीने सुशांतच्या मृत्यूची चौकशी पटणात न होता मुंबईतच व्हावी यासाठी याचिका दाखल केली होती.



from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hepAxy